THE LANGUAGE OF LINES : Mukund Malve

                           

रेघोट्या : श्रीधर अंभोरे

                                 Preview

घराच्या संबोर बाभूयबन होतं. माह्या जलमा अगुदरचं. किती वर्साचं होतं कुनास ठावूक. भलतंच दाट. मान्सायच्या जाडीवानी  त्यची खोडं डोयात दाटत. पावसयात तं मंग बाभूयबन कायेरखुटूक व्हये. खोडं लयच काये काये दिसत. रातच्या अंधारानी भेव वाटे. पन  झाडाच्या डांगा मोठ्या साबूत दिसत. हिर्वा हिर्वा रंग डोयात भरे अन्‌ मनात झिरपे. खोडाच्या कायाखुटूक रंगातून नजर सरकत सरकत  डांगी डांगीतून जाये. मोठी गंमत वाटे मले. एकटक मी बाभूयबनाकळे पायेत जावो. गावात वारं वायधन घुसलं की, आमच्या घरावरून थेट  बाभूयबनात फिरे. आंगात आलेल्या बायामान्सावानी सारं बाभूयबन हाले डोले. भलकसंच्या भलकसंच दिसे. मंग माह्यावाली माय नायतर  बय मले घरात जाले सांगे. पन मले त्या हातपाय आपटल्यावानी करणार्‍या डांगा लय आवळत. मी घरातून भायीर येवो. दारात मोठा गोटा  व्हता. त्यावर उभा र्‍हावो. अन्‌ पावो. झिपर्‍या झालेल्या केसावानी डांगा दिसत. मेस्कामाय, मरीमायसंबोर घुमनार्‍या बाया बाभूयबनात हाहेत  वाटे. भेव. मंग खोलखोल जाये. राती झोपलो की सार्‍या बाभूयबनातल्या डांगा डोयात झोके घेत.
पावसाया आला की गावात ढोरं लय मरत. लोकं ‘ढोरमर्‍यापूक नायतर म्हारपूक’ म्हनत. रस्त्यात भलकसाच गाटा व्हये.  मान्सालयले चालता येत नसे. पाय घसरून पडत. वर्तल्ल्या वेटायात ढोर मेलं की वढत वढत माह्यावाल्या दारातून नेत. त्याच्या आवाजानं  बय, नायतर माय, नायतर बाप घराच्या भायीर ये. अन्‌ इचारे, ‘कोनाच्या घरचन व्हय गड्या?’ वढत वढत ढोर थेट बाभूयबनात नेत.  त्याच्या मांगं मांगं कुत्रेबी जात. अभयात अगोदरच गिधाड, ढोक, घारी, इमानावानी घेर्‍या घेत. बाभुयबनात हळ्याची वस्ती लय व्हती.  असलं ढोर पाह्यल की बाभूयबनात सारा गोंधय व्हये. पाखराची जतराच भरे. बाभुयबन हालल्यावानी दिसे. ढोर काप्याले बसलं की  कापनाराचे मोठे हाल होत. ढोक हा पक्षी आंगावरच ये. अभायातून कळपच्या कळप मातीवर उतरे. पोराटोराले, कुत्र्यालेबी जुमानत नवते.  कापनारा जोर खावून शा दे. हातवारे करे. हळे पटकन बाभुयावर जाऊन बसत. शेवटी सर्वालेच मास खायचं असल्यानं जेवळं येईल तेवळं  घेत. अशा वेळी मोठा गलका उळे. सारं बाभूयबन थरथरे. मी लहान असल्यानं दारातून बाभुयबनाकळं नुस्तं पावो. ते भेदरल्यावानी दिसे.  मले ढोकायची लय भेव वाटे. मासाचं टोपलं डोक्यावर घेऊन मानूस आला की ढोर कापल्याजागी जरा वेळ कलकलाट व्हये. सारं सामसूम  झालं की बाभुयबन साधूवानी वाटे. उन्हाया आला की, बाभुयबनाची सिरीमंती वाळून जाये. सार्‍या बाभुया भोंगया भोंगया दिसत. एकेक  बाभुय पिशाबाईवानी दिसे. खोडं हेकोळे तेकोळे दिसत. मंग सार्‍या अभायभर काड्याच काड्या. रेघोट्यावानी. कुठी कुठी बारीक बारीक पानं  दिसत. उन्हायात बाभुयबनात लय करून भेव नवतं वाटत आम्ही लहान पोट्टे काटक्या-कुटक्या जमा कर्‍याले जात जावो. बाभुईच्या  खालून शेंड्याकळं पाह्यलं की अभाय अभाय बाभूयात दिसे. बाभुयाच्या अंगावर पाखरं बसली की, एक, दोन, तीन मोजताबी येत. पाखरं  भुर्रsss उळले की बाभुयबन ताजंतावानं वाटे. मंग पाखरं नसले की पानंबी कायेरखुटूक दिसत. जरासकबी वारं आलं तरी डांगा अभायावर  पोथारल्यावानी करत. घराची भीत माय पोथारायची तशा. हे असं पाह्यलं की, माह्यावालं मन हरकिजे. ल्हान ल्हान डांगाकळे पाह्यलं की  माही नदर आपोआप माह्यावाल्या बोटायकळे जाये. मले मोठी गंमत वाटे. माह्यावाले बोटंबी काड्यावानीच दिसत कायेरखुटूक. मंग माय-बय  जथीचा भांडेकुंडे घासे; तथून मी कोयसा उचलो. डोयात फि रत र्‍हायलेल्या डांग मंग भितीवर उमटत अन्‌ मंग भितभर रेघोट्याच  रेघोट्या. काया काया खुटूक.
                                       
भीत खराब केली म्हून मायनं, बयनं मले लय वक्ती हानलं. सुलाभाबी म्हणे, ‘फुयजी, सिरधरले शाईत घाला ना, ल्हानचुकली  पाटी द्या आनून. मंग काह्यले भीत खराब करतीन.’ माय म्हने ‘अवं सुले, त्याले बाभुयानं झपाटलंना बाई!’ पाटी आनली, पाटीचा रंग  काया. कोयस्याचा रंग काया अन्‌ बाभूयबनाचाबी रंग कायाच. अन्‌ माह्या मनात काया रंगाचं अभायच साचत गेलं. नगरहून माह्यावाल्या  गावी गेलो की, नदर आपसूक बाभुयबनाकळे जाते. आता तथीसा कायीच नाही. बापानं दारात भिता घातल्यात. आवार झालं. ज्या  गोट्यावर उभा र्‍हावो; तो गोटा न्हानीत नेला. आंघूय करायच्या वक्ती बस्याले. बाभुयबनाच्या रोखानं घरं होऊन र्‍हायलीत. तिकळं पाह्यलं  की भयान वाटतं. कायतरी हारपल्यावानी र्‍हावून र्‍हावून वाटतं... आख्खच्या आख्ख बाभूयबन डोयात उभं र्‍हायतं. त्यानं मले वाढवलं,  रमवलं, गमवलं, खेववलं अन्‌ रेघोट्याचं दान देलं. कस इसरता येईल त्याले.
आता मोठा झालो. गावोगावी जातो येतो. पन माह्यावाल्या गावच्या बाभुयबनावानी बाभूयबन दिसत नायी. मान्सावानी मानूस  तरी कुठीसा हाये. बाभूयबनाची हेतू येते. मंग मी कागदभर नुसत्या रेघोट्याच रेघोट्या वढत र्‍हायतो. हिर्व्या काया रंगाचं पांघरून आंगावर  घेऊन सुफी फकीरावानी बाभुयबन माया रेघोट्यात आशीर्वाद भरत र्‍हायते.

मुकेपण सोडताना : डॉ. संजीवनी तडेगावकर

                                      

आठ-दहा वर्षापुर्वी एके दिवशी दिवेलागणीच्या वेळी कविवर्य जयराम खेडेकर चित्रकार श्रीधर अंभोरेंना घेऊन माझ्या घरी  आले. परिचय झाल्यानंतर गप्पांची मैफल रंगत गेली; पण अंभोरे फार काही खुलले नाहीत. कदाचित ते माझा, माझ्या आंतरिक खोलीचा  आणि एकंदरीत घराचा अंदाज घेत असावेत. मीही थोडी संकोचले. प्राथमिक गप्पांच्या मर्यादा सांभाळित राहिले. नंतरच्या काळात अनेकदा  भेटी घडत गेल्या, मैफिली रंगत गेल्या आणि अंभोरे पाकळी-पाकळीतून उलगडत गेले. निस्सीम आनंददायी चर्चा होताना स्त्री-पुरुषांच्या  भेदाच्या मर्यादाही संपल्या. अनेक अनुभवलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या मुद्यांवर तत्त्वापर्यंत पोहोचणार्‍या मतांच्या खाडाखोडी होत  राहिल्या.
परवा चित्रकारितेतील समग्र योगदानासाठी त्यांना जालना येथील सन्मानाचा अजिंठा राज्य पुरस्कार एका देखण्या  समारंभात ज्येष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत प्रदान  केल्यानंतर श्रीधर अंभोरे मनोगतातून व्यक्त होत असताना माझ्या शेजारी बसलेले टोपेसाहेब मला अंभोरेंबद्दल प्रश्न विचारत होते. त्यांनी  विचारलं, हे कुठं राहतात?
मी : अहमदनगरला
ते : कुठल्या व्यवसायात आहेत?
मी : पोस्टात नोकरील होते, स्वेच्छानिवृत्ती घेतली.
ते : मुलं किती आहेत ? काय करतात?
मी : लग्नचं केलं नाही.
ते : का?
मी : नकार.
ते प्रथम आश्चर्यचकित झाले आणि नंतर गंभीर होऊन अंभोरेंचं मनोगत ऐकू लागले. मी मात्र बसल्या जागीच अनुभवलेल्या,  समजून घेण्याचा प्रयत्न केलेल्या अंभोरे नावाच्या वेदनामय गावातून भटकताना पुरती शिणून गेले. खरं तर मला अनेक प्रश्न त्यांच्या  संदर्भात होते; पण ते दुखावले जाऊ नयेत म्हणून कधी विचारले नाहीत. पुढं बोलण्याच्या ओघात सहज सगळं कळत गेलं आणि मी  अस्वस्थ होत गेले.


ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या घरात जन्मलेल्या कलावंतांच्या नशिबी जे भोग येतात ते भोगत, अपमानाचे उपेक्षेचे,  अवहेलनेचे चटके सहन क रीत लहानाचा मोठा झालेला हा कलावंत. आपलं सामान्यपण सांभाळून सौंदर्याची आस धरून चांगुलपण जपत  नोकरीनिमित्त अकोल्यापासून अहमदनगरपर्यंत पोहोचलेला धडपडणारा तरुण. कंठात बासरीची धून आणि ओठात हिरवं ओलं गाणं घेऊन  पांढर्‍या वस्त्रावर मनातल्या इंद्रधनूचा नित्यनव्या रंगात कशिदा काढण्याचं वेड जपणारा कलावंत... पोस्टातल्या रटाळ ठिकाणी आपल्या  कलात्मक दृष्टीनं चैतन्य निर्माण करू पाहणारा एके दिवशी आसर्‍याच्या शोधात नगरच्या गल्लीतून फिरत असताना एका दारापुढं  अचानक उभं राहतो, आणि तारुण्यसुलभ भावनेनं वेडावून जातो. पाहतच राहतो... बराच वेळ... तिथं एका दारात एक सुंदर तरुणी उभी  होती. कितीतरी वेळ हा मुलगा आपल्याकडं पाहतोय म्हटल्यावर तिनं नजरेनच जाब विचारला. नंतर योगायोगानं तिच्या घराजवळच  खोली मिळणं आणि तिचं सारखं-सारखं दर्शन होणं, कुठल्यातरी निमित्तानं सतत संपर्कात येणं, या सगळ्यातून कळत-नकळत एकतर्फी  प्रेमाची लागण न झाली तरच नवल. तारुण्यसुलभ स्वप्न पाहणं, आरशाशी मैत्री होणं, वाट पाहणं, हुरहुर वाटणं ती वाढत जाणं, असं  काहीसं सुरू झालं. अशातच एकदा रूम पार्टनरनं मुलीसमोर सहजच लग्नाचा प्रस्ताव ठेवला अन्‌ तिनं तो झिडकारून नाकारला. झालं ! या  प्रसंगाचा परिणाम संवेदनशील मनावर असा काही झाला की पुढं अंभोरे आजीवन अविवाहित राहिले. केवढा हा निग्रह. केवढी साधी  वाटणारी गोष्ट; पण परिणाम किती खोल... हे ऐकून तर मी चक्रावूनच गेले.
                                        

पुढच्या आयुष्यात त्यांनी स्वत:ला पूर्णत: कामात नि छंदात बुडवून घेतलं. ‘दिंडी’ आणि ‘आदिम’ चे काही अंक मी पाहिले  आहेत. किती प्रचंड मेहनत आहे त्यात. सुवाच्य हस्ताक्षरांत लिहिलेले, प्रत्येक पानावर अधे-मधे रेखाटनांनी नुस्ते बोलके झालेले, नीटनेटके,  वाचनीय असे. संपादक सदाशिव अमरापूरकर असले तरी सर्व झाक अंभोरेंची. काय कष्ट पडत असतील हे सर्व करताना. नोकरी सांभाळून  रात्रीचा दिवस करून सर्व अभाव असताना केलेलं हे काम. त्यामुळंच तर अंकाला लोकप्रियता भरपूर मिळाली.
कधी कार्यक्रमाला जाता-येता आम्ही मुद्दाम अहमदनगरला त्यांच्या घरी चहासाठी थांबतो. साधं, नेटकं, स्वच्छ घर पाहिलं की  असं वाटत नाही की या घरात घ्बाईङ नाही. सगळं कसं जागच्या जागी. एका स्त्रीच्या विनम्र आग्रहानंच ते येणार्‍याचं आतिथ्य करीत  असतात. त्यांचे कपडे तर इतके स्वच्छ आणि नीटनेटके असतात की घरात बायको असणार्‍या इतर कुठल्याही नवर्‍याचे नसतील.
घराचं घरपण जपताना वापरायच्या अनेक युक्त्या त्यांना माहीत आहेत. अनेक मित्रांच्या बायकांना ते अनेक पदार्थ आवडीनं  एखाद्या घ्सुगरणीङ सारखे शिकवत असतात. स्त्रियांचे स्वभाव, आवडी-निवडी, विक पॉइंट आणि दुसर्‍या मनाचा उसमारा त्यांच्या ओळखीचा  आहे. हे सगळं समजून घेताना त्यांच्या स्वभावात एक मृदूपण येतं. एकदा न राहून मी त्यांना विचारलं होतं. एवढ्या सगळ्या मित्रांचे  भिन्न स्वभाव, विचित्र सवयी आणि तरी तुमचं पटतं कसं? तेव्हा किंचित हसून ते म्हणाले होते. त्याचं काय आहे... प्रत्येक गटाचे, तटाचे,  स्वभावाचे, विचारसरणीचे अनेक लोकांचे अनेक अनुभव आल्यानंतर कोणामध्ये काय उत्तम आहे. कोणाला काय चालतं आणि काय चालत  नाही. याचं तंत्र सांभाळलं की झालं ! शिवाय एखाद्याच्या अनेक गोष्टी वाईट आहेत; पण एक अतिउत्तम तर त्या एका गोष्टीसाठी दुसरीकडं  कानाडोळा करून आपल्याला हवं तेवढं स्वीकारायचं, जमून जातं मग सगळं. बापरे ! मला वाटतं, खूपच अवघड आहे हे ! पण अंभोरेंना ते  जमलंय, त्यामुळं कुठलाही खडखडाट न करता एवढे मित्र ते सांभाळतात.
माझ्या सर्वच पुस्तकांसाठी मोठ्या आनंदानं त्यां नी चित्र आणि रेखाटनं दिली. इतकंच काय घ्फुटवेङ आणि ‘अरुंद दारातून  बाहेर पडताना’या पुस्तकांच्या वेळी दिवसभर प्रिंटिंगमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून काम केलं. निर्मितीमध्ये नवनवे प्रयोग केले. पुस्तकाचे  प्रकाशक असलेले जयराम खेडेकर यांचं निर्मितीसाठी असलेलं प्रचंड वेड आणि अंभोरेंची कलात्मकञ्ृष्टी या दोघांच्या अनुभवातूनच  पुस्तकांना देखणेपण मिळालं. पुढं ज्याचं कौतुक अख्ख्या मराठी वाचकांनी केलं. जवळ-जवळ सर्वजण माझ्या अगोदर या दोघांना  पुस्तकाबद्दल बोललेले असायचे. मित्र म्हणून एकदा स्वीकारल्यानंतर त्याला जपताना कुठलं गणित मांडत बसायचं नाही. हे सूत्र  त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. असंच एकदा त्यांच्या घरी कुंडीतील लोभसवाण्या रोपाला मी हात लावून घ्छान आहेङ असं म्हणत  होते. तर परत निघताना त्यांनी ती कुंडीच माझ्या हातात ठेवली. मी खूप ओशाळले. फिरून कधी त्यांच्या कुठल्या वस्तूला हात लावून  घ्छान आहेङ असं म्हणण्याचं धाडस मी केलं नाही.
                                             

एकदा नव्या पुस्तकासाठी काही रेखाटनं लागत होती; पण अंभोरे आजारी होते. उपचार चालू होते. मी काहीच बोलले नाही.  बरेच दिवस, महिने उलटले. मला मनातून वाईट वाटत होतं, आता त्यांचे चित्र घेता येणार नाही म्हणून ! पण एक दिवस असेच माझ्या  घरी आले असता इकडच्या तिकडच्या गप्पात, नवं काय लिहिलं? असं त्यांनी विचारलं. मी नव्या पुस्तकाबद्दल बोलले; पण काही मागण्याचं  धाडस केलं नाही. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते पुन्हा आले. हातातील पिशवीतून एक पुस्तक बाहेर काढलं, त्या पुस्तकाच्या पानापानातून  एक-एक चित्र, रेखाटन बाहेर काढू लागले. त्यात माझं काढलेलं एक रेखाटनंही होतं. मी पाहतच राहिले. कधी केलं हे सारं? असं  विचारल्यावर म्हणाले या दोन दिवसांत. माझे डोळे भरून आले. भरल्या नजरेनं मी अंभोरेंकडे पाहत राहिले. सांगूनही न कळल्याचं सोंग  घेणार्‍या या दुनियेत न सांगता कळणारा नितळ मनाचा माणूस माझ्यासमोर उभा होता.
ते जालन्यात आले की खेडेकर सरांच्या आणि त्यांच्या जवळ-जवळ रोजच भेटी होतात, खेडेकर सरांच्या घराजवळच  अंभोरेंच्या भावाचं घर असल्यामुळं, त्यामुळं माझ्याकडं येताना नेहमी दोघं मिळूनच येतात. एकदा असेच ते दोघं आलेले. माझं नुकतच  स्त्रियांच्या कवितेवर पीएच. डी. चं काम झालेलं. पुरुष स्त्रियांना कसा त्रास देतात. कुठल्याही देशातील सिस्टम कशी पुरुषसत्ताक आहे. प्रत्येक  क्षेत्रात कसं हेतुपुरस्सर स्त्रियांकडे दुर्लक्ष करण्याचं, त्यांना उपेक्षित ठेवण्याचं काम होतं? अनादि काळापासून कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक  कालखंडात स्त्रियांची स्थिती कशी खालावत गेली. वगैरे, वगैरे. तो विषय पुरता माझ्यात भिनला होता. त्यादरम्यान कुठलाही पुरुष पाहिला  मला त्याचा खूप राग येई. मी त्या पुरुषाला युगानुयुगापासून स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा जाब विचारी. त्यादरम्यान माझ्या आलेल्या  बर्‍याच जणांना त्यास बळी पडावं लागलं होतं आणि अशात हे दोघं माझ्याकडं आलेले. चहापाणी झालं आणि मी मूळ विषयावर सुरू  झाले. अंभोरे म्हणायचे अहो तसं नाही. मी म्हणायची, काय तसं नाही. मीरा पहा,  द्रौपदी, सीता, अहिल्या, राधा, जिजामाता, अहिल्याबाई  होळकर, सावित्रीबाई फुले. कुठलीही स्त्री पाहा. किती वेदना, कुणी दिल्या त्यांना ? काय चुकलं त्यांचं?  अंभोरे मला समजावून सांगू पाहायचे  आणि माझे प्रश्न उपस्थित व्हायचे. कितीतरी वेळ हे चाललं होतं. अंभोरे वैतागुन गेले. काही समजुन घेण्याची माझी अजिबात मानसिकता  नव्हती. खेडेकर सर आणि पंडितराव तडेगांवकर हे दोघं नुसते गप्प राहून पाहत होते. त्यांना अलीकडे हे माझं नेहमीचंच झालं होतं. मला  हे असं अचान क काय झालं अंभोरेंना कळेना. ते त्रस्त होऊन निघुन गेले. मी शांत झाले. पंडितराव अजूनही माझ्याकडं पाहतच होते.  आता मला वाईट वाटू लागलं. ज्या माणसानं लग्नच केलं नाही. बाईला तर सोडा मुंगीलासुद्घा कधी त्रास दिला नाही. चिमण्यांना  चारापाणी ठेवून त्यांच्यासाठी दिवसभर खिडकी उघडी ठेवून त्यांची वाट पाहणार्‍या, स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍यालाच  रागाच्या भरात मी जाब विचारत होते, असे अनेक गमतीशीर प्रसंग घडत होते.
एकदा ते मला म्हणाले, तुम्हाला टोमॅटो जॅम शिकवितो. मी खुश झाले. जॅमसाठी मी सगळी तयारी करून ठेवली आणि   गावाकडून त्या दिवशी अचानक सासू-सासरे व इतर पाहुणी मंडळी आली. झालं ! एका पुरुषानं सुनेला सर्वांसमोर जॅम शिकवावा हा विचार  त्यांना पचेल का? या विचारानंच जॅम शिकणं मी कॅन्सल केलं व इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं. घ्काय हो,  तुम्ही एवढं फिरता तुम्हाला अनेक मित्र आहेत, तशा मैत्रिणीही असतील, कोण आहेत त्या?ङ मुळात स्त्री-पुरूष मैत्रीबद्दल तुम्हाला काय  वाटतं?
खूप विचार करून आणि आठवून त्यांनी सांगितलं, दूरची मैत्रीण अरुणा ढेरे आणि जवळची सुमती लांडे, तिसरं नाव मात्र  त्यांना सांगता आलं नाही. अरुणा ढेरेंसोबत फार दिवसांपूर्वी पत्रव्यवहार (तुरळक) झाला होता आणि कधी-तरी भेटीगाठी, गप्पा. सुमती  मात्र नगरच्या जवळ राहायला. शिवाय कवी-प्रकाशिका, त्यामुळं कामाच्या निमित्तानं भेट व्हायची. तिची विचारसरणी, प्रचंड मेहनत घेण्याची  तयारी, संघर्षमय आयुष्य यातून उभं राहताना एक स्त्री धडपडतीय हे सगळं पाहून तिच्याबद्दलचा आदर वाढत गेला. विचार जुळले आणि  आजपर्यंत मैत्री टिकून राहिली. मुळात स्त्री-पुरुष मैत्रीकडं बघण्याचा समाजाचा ञ्ृष्टिकोन पहिल्यापासूनच फार काही स्वच्छ नाही. त्याला  कारणंही असतील; पण समज-गैरसमज पुरुषांच्या मैत्रीपेक्षा स्त्रियाची मैत्री फार त्रासदायक ठरते. निखळ मैत्रीतही तिरकस नजरा-कुत्सित  हसणे आणि लागट टोमणे शांतपणे स्वीकारावे लागतात. त्याला इलाज नसतो. मुळात स्त्रियांशी मैत्री आणि तीही सत्तरच्या दशकात जरा  अवघडच होतं. त्यामानानं आजचं चित्रं आशादायी आहे. नव्या विचाराचं लोक स्वागत करताना दिसतात. असं सांगत असतानाच मित्रांच्या  घरी पहिल्यांदा गेल्यावर बायकोची प्रतिक्रिया किंवा घरातील वयस्क माणसांच्या नजरा, हावभाव याचं वर्णन करावं ते फक्त अंभोरेंनीच.  बालपणी न्याहाळलेल्या गमतीशीर अनुभवात तपकिरी ओढणार्‍या आजी-आत्या आणि गावातील बायकांच्या गप्पा व वर्‍हाडी बोलीसह  अशा बारीक झटक्यात-मुरक्यात अंभोरे सादर करतात की थक्क व्हायला होतं, खेड्याचं अभावयुक्त जिवंत चित्र सांगताना  मिश्किलीसोबतच, लोक कसे जगतात? याचं जिवंत चित्र आपल्या डोळ्यापुढं उभं राहतं. ते अनुभव मोठे गमतीशीर असतात. शब्द  उच्चारणातील नाट्य, लालित्यपूर्ण हालचाली, प्रसंग खुलवणारी भाषिक शैली, प्रसंगानुरूप बदलवणार्‍या लकबी हे पाहताना धीरगंभीर होऊन,  अलिप्तपणे थोड्या वेळापूर्वी खुर्चित बसलेला माणूस तो हाच का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. नगरला सुरुवातीच्या मुक्कामात ते  एका मुस्लिम कुटुंबात राहत असत. अंभोरेंचा नि त्या म्हातारीचा असा काही सूर जुळला होता की, सोबत जेव्हा केव्हा ती खुराचे सूप  करीत असे तेव्हा वाटीभर सूप अंभोरेंसाठी बाजूला काढून ठेवी. दिवसभर वाट पाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर घरी पोहोचणार्‍या  अंभोरेंना आवाज देऊन पिण्यास देई. दिन भर किधर घुमता रे, माट्टमेल्ला रात को जल्दी आने को क्या रोग आया । हाय s अल्ला s  क्या रे आज कल के छोकरे माँ ! असं म्हणत, खाणा खाया क्या? नहीं तो खा ! असं म्हणणार्‍ या नानीबद्दल ममत्वानं गहिवरून बोलणारे  अंभोरे मी पाहिले आहेत.
एकदा बोलता-बोलता बाजूलाच ठेवलेली आणि नुकतीच विकत घेतलेली साडी दाखवली, आणि सुरू झालं त्यांचं कपड्यावर  भाष्य, साड्यांचे रंग, पोत, काठ, पदर, व्यासपीठीय साड्या, घरगुती साड्या, लग्न समारंभातील साड्या, कोणत्या, कुठं, कशा चांगल्या  दिसतात. कोणत्या स्त्रियांना साड्या चांगल्या दिसतात. चांगले दिसण्यात प्रसंगानुरूप साड्या कशा चांगला सेन्स असणार्‍या स्त्रिया कोणत्या,  साड्या कुठं चांगल्या मिळतात, त्या कशा निवडाव्यात वगैरे. ते इतकं भरभरून सांगत होते की क्षणभर मला वाटलं. यांनी लग्न केलं  असतं तर त्यांच्या बायकोला किती छान-छान साड्या नेसायला मिळाल्या असत्या. त्यामुळं गंमत म्हणून मी त्यांना विचारलं, ती एक  सोडली तर उभ्या आयुष्यात तुम्हाला कुठल्याच स्त्रीचा मोह झाला नाही का?
यावर खळखळून हसत ते म्हणाले; त्याला काय म्हणता येईल मला माहीत नाही; पण काही गोष्टी मात्र आवडल्या होत्या.  त्यातील एक म्हणजे मढीला खूप मोठी जत्रा भरते. तिथं अवघ्या भारतवर्षातून आदिवासी, भटके, अनेक जाती-धर्मांचे लोक येतात. तिथं  त्यांच्या पंचायती बसतात. भांडण-तंटे मिळतात, लग्न ठरतात, होतात. कलावंतीय हौस म्हणून मी एकदा तिथं गेलो. ब्रश, पेन्सिल, कागद,  कॅमेरा असं सगळं शबनममध्ये होतं. सगळीकडं अतिशय नयनरम्य दृश्य दिसत होते. मी वेड्यासारखा नुसते फोटो काढत होतो.  आजूबाजूला सगळी बोचकी आणि बाजूला ती एकटी बसलेली. एवढी सुंदर, निरागस, विलोभनीय की बस्स तिचा साज-बाज सगळं कसं  गावरान; पण तिचं तिला शोभणारं. मी तिथे पटापट फोटो काढत होतो. तेवढ्यात तिचे नातेवाईक तिथं आले. त्यांनी माझी बखोटी पकडून  मला मारायला सुरूवात केली. रेखाटनं फाडली, कॅमेर्‍यातील रीळ काढून तोडून टाकली. शबनमसह सगळं जाळून टाकलं आणि शिव्यासोबत  मारत असताना तिथं त्यांच्यातला एक लीडर टाईप माणूस आला. त्यानं मला सोडवलं. जाऊ द्या पत्रकार असेल म्हणून सोडून दिलं. माझी  अवस्था प्रचंड दयनीय झाली; पण परिणाम असा झाला की त्या पोरीनं माझ्यातल्या कलावंताला वेड लावलं. तिचा चेहरा मला सारखा  दिसु लागला. बसता, उठता, खाता, पिता मी तिची अनेक रेखाटनं केली. खरं तर माझ्या चित्रांना कधी चेहरा नसतो; पण नकळत आलंच  तर त्या चेहर्‍याचं होतं आणि दुसरा असाच गमतीशीर प्रसंग माझं कलावंतीय वेडेपण मला अनेक ठिकाणी भटकायला लावतं. एकदा  असंच काही कामानिमित्त केरळला जायला मिळालं. मी भारताच्या अनेक भागात गेलो; पण केरळमध्ये जे अप्रतिम सौंदर्य मी पाहिलं तसं  अजून तरी कुठं दिसलं नाही. तिथल्या स्त्रिया उंचपुर्‍या, ठसठसीत बांध्याच्या, काळ्या-सावळ्याच; पण सतेज कांतीच्या, टपोर्‍या बोलक्या  डोळ्याच्या, गुडघ्यापर्यंत लांब काळ्याभोर केसांच्या जणू सळसळतं चैतन्य, प्रत्येकीच्या डोळ्यात काजळ नि केसांत गच्च अबोली फुलांच्या  वेण्या. त्यांना पाहण्यासाठी मी दिवसभर वेड्यासारखा फिरत असे. भल्या सकाळी समुद्रकिनार्‍यावर अबोली आणि मोगर्‍याच्या फुलांचे  विक्रीसाठी मांडलेली मोठ-मोठ्ठे ढीग. अस्सं मनोहारी दृश्य दिसायचं ना ते ! मुदत संपली तरी ती वाढवून मी तिथं तीन-चार दिवस  भटकत होतो, त्या स्त्रियांना बघत, त्यांच्या सौंदर्याचा, निसर्गाच्या या कलाकृतीचा निखळ आनंद घेण्याच्या वृत्तीची प्रामाणिक कबुली द्यायला  ते विसरत नाहीत.

                                          

चांगली चित्रशैली म्हणजे काय? चित्रं कसं पाहावं? चित्रकाराचं वाचन कसं असावं? चित्रकाराच्या शैलीवर धर्माचा, जातीचा,  जडणघडणीचा, परिसराचा, संस्कृतीचा, विचारसरणीचा परिणाम होतो का? या सगळ्यांबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं. यावर सम जावून  सांगताना आदिम चित्रइतिहास ते कोणार्क मंदिर, वेरूळ-अजिंठ्याच्या लेण्यातील चित्र, शिल्प प्रकार, शिवपुराण आदीचा बारकाव्यानिशी  चित्राचा महत्वपूर्ण इतिहास सांगताना, न्यूड चित्र, नैतिक-अनैतिक, विचारप्रणाली, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक स्थिती, चित्राची भाषा, रंग,  प्रकार, चित्रावर काळातील जीवनशैलीचा परिणाम, मानवी ताणतणावाचा परिणाम, स्त्री-पुरुष संबंध, त्यातील निरागसता, निकोपपण, चित्राकडं  पाहण्याची, समजून घेण्याची दृष्टी, त्यातलं पावित्र्य, अभिजातपण. इ. भारतीय चित्रकार व त्यांची शैली हळदणकर, राजा रवी वर्मा-ते  अजिंठ्यातील प्रकाश तांबटकर त्यांच्यापासून ते पिकासो, वैनगॉग पॉली यांची शैली. चित्रातील रेषा, रंग, आकार आणि अवकाशामुळं  चित्रातल्या वस्तूंना, व्यक्तींना कसं महत्त्व येतं. चित्राला वस्तूपासून मुक्त करण्याचं नकारात्मक श्रेय जसं पिकासोला जातं;  पण चित्रातील  संपूर्ण चौकटीतील लयपूर्ण अनुसंधान एकाग्रतेनं शोधण्यात प्रक्रियेची परिणती व्हायला हवी होती. हे काम पिकासोनं केलं नाही. ते  वॅनगॉगनं पूर्ण केलं. चौकटीतील अवकाशात रंगाची मुक्त क्रीडा घडत  असताना त्याला अवरोध न करता निसर्गातील आकारघटितांचे  दधिक विश्लेषण मूलग्राही वृत्तीनं समजून घेतलं पाहिजे. सर्जनकाळी मनातील बौद्घिक प्रक्रियांना विराम देऊन अंत:करणातील उपजत प्रेरणेने  मुक्ताविष्कार साधला पाहिजे. कारण निर्मितीच्या वेळी बौद्घिक यंत्रणा कधी-कधी अडगळ ठरते. निसर्गातील वास्तुविश्र्वासाचा शोध फक्त  रंग, रेषांच्या बाजूनं न घेता कलावंतांच्या सर्जनशील जाणिवेतून घेता आला पाहिजे. त्यामुळे चित्र कोरडं- शुष्क वाटत नाही तर त्याला  मानवी भावजीवनाचा ओलावा येतो. जीवनरसातून कलाकृतीत ऊर्जा निर्माण होते. त्यामुळं कलाकृतीचा आशय जीवनातूनच शोधायचा.  त्यामुळं कलाकृतीत त्याचं सौम्य येणारच.
अशी चर्चा रंगात गेली की चार-पाच तास कसे जातात. कळतसुद्घा नाहीत. चर्चा नेहमीच विषयाच्या तळाशी घेऊन जायची.  कधी-कधी इतकं नवं ऐकायला मिळायचं की माझी दमछाक व्हायची. कधी धर्मावर तर कधी अध्यात्मावर, कधी गमतीजमती तर कधी  जगण्या-मरणावर ! एकदा मी म्हटलं, तुम्ही मृत्यू पाहिलाय का? मरण येतं म्हणजे नेमकं काय होतं? कसा जातो जीव? त्यावर मृत्यू  म्हणजे शरीर क्षीण होत जाणे, श्र्वास घेण्याची गती मंदावणे आणि शेवटी श्र्वास घेता येईल इतकीही शक्ती न उरणे, म्हणजे जीव जाणे.  किती अवघड प्रश्नावर केवढ सापं उत्तर.
कधी साधा-सोपा-गरीब वाटणारा माणूस खोडकर आहे असं कुणाला सांगूनही पटणार नाही; पण अनेक वेळा आपल्या गर्द  काळ्या रंगाचा आणि पांढर्‍याशुभ्र कडक इस्त्रीच्या कपड्याचा फायदा उठवत आंध्रचे माजी आमदार म्हणून अनेकदा सरकारी मेजवान्या  झोडल्यात तर कधी कॅनड, बॅनग्ड बोलून पॉपलेट मासे फस्त केलेत.
कधी-कधी अंभोरे सरांबद्दल विचार करताना मला उगाच असं वाटतं. बरं झालं यांनी लग्न केलं नाही, कदाचित त्यामुळं खूप  मर्यादा आल्या असत्या त्यांच्यातील कलावंतावर. मुलखावेगळी भटकंती, अनुभवाचं समृद्घ आयुष्य, प्रेमळ मित्रपरिवार किती मजा आहे  यांची; पण अलीकडं त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी पाहता असं वाटतं, कुणी तरी पाहिजे होतं ह्यांना बांधून ठेवणारं, काळजी घेणारं, आपण  सर्व मित्र आपापल्या घरात व्यापात गुंतलेले नि हा माणूस कुणाला त्रास होणार नाही याची आजन्म काळजी वाहणारा. गौरवग्रंथाच्या  निर्मितीचा विचार जेव्हा खेडेकर सरांजवळ बोलून दाखवला तेव्हा त्यांनी तात्काळ ती जबाबदारी स्वीकारली. श्रीधर अंभोरेंवर प्रेम  करणार्‍या मित्रांना जेव्हा फोन लावले, तेव्हा सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वत:बाबत बोलण्यासाठी  अंभोरें नी जरी मौनव्रत धरलं  असलं तरी आम्हाला या निमित्तानं मुकेपणा सोडता आलं याचा आनंद आहेच.
श्रीधर अंभोरे नावाचा माणूस नेमका कसा आहे? याची जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीनं त्यांची समीक्षा  करीत असतो. समंजस, प्रगल्भ, व्यासंगी, प्रसंगी खट्याळ, खोडकर अशा वेगवेगळ्या भूमिकांत अंभोरे सतत भेटत आले आहेत.
माणसानं कुठल्या आई-वडिलांच्या पोटी कुठल्या जातीत, धर्मात, देशात जन्मावं याचं स्वातंत्र्य त्याला कधीच नसतं; पण  जन्माला आल्यानंतर त्यानं कसं जगावं, काय करावं, काय करू नये याचं स्वातंत्र्य मात्र कमी-अधिक प्रमाणात त्याला मिळवता येतं.  अंभोरेंच्या बाबतीतही तेच झालं. दलित समाजात, प्रतिकूल परिस्थितीत जन्माला येऊनही त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. जातीचे  फायदे घेतले नाही किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी कधी त्याचा वापर केला नाही, तर उलट आयुष्यभर नेहमी सर्वसमावेशक भूमिका  घेऊन सर्वव्यापी होण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्यांना त्यात यशही मिळालं. महाराष्ट्रभर विखुरलेल्या सर्व जाती-धर्मांचा नि कला  प्रकारातील त्यांचा मित्र परिवार पाहिल्यावर हे सहज लक्षात येतं.
चित्रशैलीच्या बाबतीतदेखील आपल्या अभावाच्या जागांना प्रभावशील बनवून त्यांच्या कुंचल्यानं बाभळीसारख्या काटेरी  झाडाला त्यांनी मोरपिसाचं वैभव प्राप्त करून दिलं. अपार कष्ट, दु:ख, दैन्य, दारिद्र्य याची वेदना चितारताना चेहरा हरवलेली, राब राब राबून  रापलेली माणसं पाहिली की काळजात चर्र होतं. त्यांच्या चित्रांना समजून घ्यायला गेलं तर दु:खानं थिजायला होतं. तसं पाहिलं तर  अंभोरेंकडे स्टुडिओ नाही. मोठमोठ्ठी रंगीत, देखणी, पेंटिंग्ज नाहीत; पण तरी अंभोरे महाराष्ट्राच्या कलाप्रांतात सर्वपरिचित व प्रसिद्घ आहेत.  ‘दिंडी’, “आदिम’, ‘हंस”, ‘अस्मितादर्श’, ‘ऊर्मी’, ‘अनुष्टुभ’, ‘सर्वधारा’...
यासारख्या मराठीतील महत्त्वपूर्ण नियतकालिकांतून आणि अनेक मित्रांच्या पुस्तकावरील मुखपृष्ठ व आतील रेखाटनांतून  अंभोरेंच्या चित्रांनी पुस्तकांना देखणेपण, नेटकेपण, आशयसंपन्न केलं आहे.
जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, डॉ. राजन गवस, रंगनाथ पठारे, डॉ. गंगाधर पानतावणे, रामदास फुटाणे, जयराम खेडेकर,  राजन खान, निळु फुले, सदाशिव अमरापुरकर, अरुणा ढेरे, सुमती लांडे, सतीश बडवे, या मराठीतील प्रतिष्ठित मान्यवरांपासून ते नव्या  पिढीतील अगदी कुठल्यातरी कानाकोपर्‍यातील नवोदितांपर्यंत त्यांचा दोस्ताना पाहिल्यावर माणूस प्रेमी, माणुसकेंद्री व्यक्तिमत्व आहे, असं  वाटल्यावाचून राहत नाही. आपल्या आनंदाच्या, सुखाच्या प्रसंगी हमखास सहभागी होऊन मोकळी दाद देणारा तर दु:खाच्या वेळी ओल्या  नजरेनं दुरूनंच मूक दिलासा देणारा हळव्या मनानं समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणारा मन जगणारा प्रगल्भ कलावंत म्हणून  अंभोरे सतत भेटत आले आहेत. 

काळाच्या दगडावरची रेघ : श्रीधर अंभोरे : श्रीकृष्ण राऊत,

                                     

                                                                प्रिय श्रीधर अंभोरे,

मे १९८३ ला तुझ्या रेखाचित्रांना मिळालं फाय फौंडेशनचं पारितोषिक पाच हजार रुपयांचं. हे ऐकून-वाचुन आज माझं मन  प्रसन्न झालं आहे. वार्‍यापेक्षाही हलकं... अगदी तरल मनात आत... आत... खोल... खोल... अंतर्मनाच्याही पार पल्याड कुठंतरी हळुवार  उमलत आहेत एका अलौकिक हर्षकमळाच्या पाकळ्या. ह्या उमलण्याची मोरपंखी संवेदना जाणवत आहे मला तीव्रपणे, ह्या आनंदलाटा, ही  सुखद भरती, हा हर्षकल्लोळ...! अभिनंदन ह्या तोकड्या शब्दांच्या इवल्याशा ओंजळीत सामावणारे नाही. सामावणे केवळ अशक्यच!  जगातल्या संपूर्ण भाषा आणि तमाम लिपींनाही शक्य् ा नाही माझी ही सविकल्प समाधी शब्दबद्घ करणं... मी अनुभवीत आहे एक  शब्दातीत स्पंदन हृदयाचा गाभारा झंकारित करणारा एक नादमय हिंदोळा... शब्दांच्या मिळीला लख्ख आव्हान करणारा काव्यमय पारा.  जो निसटू पाहतो आहे क्षणोक्षणी आणि मी... जिवाच्या आकांतानं करतोय प्रयत्न त्या काव्यमय पार्‍याला अलगद धरण्याचा... अलगद  कवटाळण्याचा... अध्धर उचलण्याचा...
रूपाला आग लागलेल्या अभिजात सौंदर्यवतीच्या सौंदर्याची द्यावी दाद तिच्या हातबोटांची पटापट चुंबनं घेऊन, तशी द्यावीशी  वाटते मला दाद... आज... तुझा निग्रोसारख्या काळ्याशार बोटांची, घ्यावीशी वाटतात चुंबनं पटापट... कदाचित... कदाचित... तीही माझ्या  मनाचं वाटणं व्यक्त करू पाहणारी असेल एक देखणी तर्‍हा..
तुझ्या जीवघेण्या रेषा तर केव्हाच गोंदून घेतल्या आहेत मी माझ्या डोळ्यावर आणि ओवाळून टाकला आहे जीव तुझ्या  रेखाचित्रांवरून, तुझ्या मैत्रीवरून व तुझ्यावरूनही त्रिवार ! अशा विलक्षण नात्यानं 'माझ्या ' झालेल्या तुझ्या अफलातून रेषांची कदर केली  आहे फाय फौंडनने. पाच हजारांचं पारितोषिक देऊन.
डॉ. जयंत नारळीकर, आर. के. लक्ष्मण, जी. ए. कुलकर्णी यांच्यासोबतच तुझाही गौरव करणार्‍या फाय फौंडेशननं तुझ्या  गौरवाला दिली एक झळाळती किनार, एक लखलखती झालर, एक वेगळं डायमेन्शन...! हे तर सगळे आपापल्या क्षेत्रातले घ्बापङ आणि  तुझ्या सुकुमार रेषांची नव्हाळी... आताशा कुठं 'मॅच्युअर्ड ' झालेली. तुझ्या तारुण्याच्या आणि तुझ्या रेषांच्या यौवनाच्या उंबरठ्यावर असं  घ्मापङ शिगोशिग भरून ठेवणार्‍या फाय फौंडेशनचं मी करतोय मन:पूर्वक अभिनंदन आणि देतोय शतश: धन्यवाद फाय फौंडेशनला.
ग्रेसच्या शब्दांची सोबत करण्याची तुझ्या रेषांची इच्छा पूर्ण केली तरुण भारतातल्या ' मितवा ' नं. माझ्या कवितांसाठी तू  काढलेल्या त्या रेखाचित्रांनी मला दिलेल्या तुझ्या इच्छापूर्तीचा आनंद अनुभवतानाही मी झालो होतो असाच हलका, तरल, हळवा.
कवींना भेटायला याव्यात कल्पना, शब्द तशाच येत असतील तुला भेटायला रेषा... विविध आकार लयबद्घ करीत लवचिकपणे  आणि घनगर्द मेघातून नर्तन करीत यावी वीज तशा असतील उमटत तुझ्या बोटांतून कागदावर... शाईतून जळत... उजळत...
अकोला जिल्ह्यातील चिखलगावला तुझ्या जन्मगावी... अंबादास अंभोरे-तुझे बाप... बापाच्या हातात दोर... कधी सरळ... कधी  लयदार... मधात ढोर... अलीकडे सगळं बळ एकवटून ढोराला लोटणारा तुझा इवलासा जीव आणि एक क्षण मंतरलेला, भारावलेला, तुझ्या  रोमरोमी भिनलेला. अख्खे अस्तित्व व्यापून टाकणारा, तुझ्या डोळ्यापुढं अस्पष्ट होत गेला पलीकडचा बाप आणि पुसट होत गेले  अलीकडचे ढोरही... तुझ्या घनगर्द बुबुळांवर विजेचे भयभयाटी नर्तन करणारा फक्त दोर ठळकपणे... कधी सरळ... कधी लयदार... कधी  सरळ ! दोर राहिलाच नाही. तो झाला अभिव्यक्तीचं एक रूप. एक रेषा. तुझ्या बोटांना एक अपूर्व कंप, एक नवथर थरथर, एक नवजात  अप्रूप ! याचक्षणी झाली तुला रेषा प्रसन्न-कधी सरळ, कधी लयदार...
एक वेगळाच कॅमेरा झाला तुझ्या डोळ्यात फिट. आखरातल्या निष्पर्ण बाभूळबनातील एकमेकात गुंतलेल्या काळ्याभोर  असंख्य काड्या स्वत:चे आकार ठसवीत शिरल्या तुझ्या डोळ्यात कायमच्या. बसल्या रुतून. निगेटिव्ह बनून. कधी त्या उमटायच्या  पॉझिटिव्ह होऊन शाळेच्या पांढर्‍या शुभ्र भिंतीवर कोळशानं तर कधी उमटायच्या काळ्या डांबरी सडकेवर लेखणीच्या तुकड्यानं. जशी ही  अभिव्यक्ती होती अटळ, अपरिहार्य, अविभाज्य, बाहेरून कुणाची जबरदस्ती नव्हती तुझ्यावर-तू चित्रं काढावीस म्हणून. तुझा छंद  जोपासण्याची नव्हती कुणाची इच्छा आणि ऐपतही. ही होती फक्त तुझी निखळ अंत:प्रेरणा, व्यक्त होण्यासाठी बेचैन  करणारी  उमटण्यासाठी अस्वस्थ करणारी.
अशीच एकदा चिखलगावात लागलेली आग. अजूनही जळते तुझ्या डोळ्यात एक निगेटिव्ह बनून. आग विझवण्यासाठी घागरी  घेऊन जाणार्‍या बाया... त्यांच्याही देहांचे घट आणि लयदार घाट उमटतात त्या निगेटिव्हमधून लयबद्घ आकार घेत. देहांचे घट आणि  मातीच्या घागरी एकमेकात मिसळून... ‘अस्मितादर्श’च्या पानावर... एक अप्रतिम रेखाचित्र होऊन.
डॉ. पानतावणे सरांनी सर्वप्रथम तुला दुकानात नेऊन दिली करून ओळख... आर्टपेपरची शाईची... विविध पेनांची आणि  रंगांचीही. नंतर रंगांशी खेळून पाहिलंस तू काही दिवस; पण रंग लागले नाहीत तुला धार्जिणे, जमला नाही तुझा सुर त्यांच्याशी आणि  खुणावत राहिल्या तुला रेषा नवनव्या तर्‍हेनं. कात टाकून नजर ठहरू न देणार्‍या नागिणीसारख्या पुन: पुन्हा...
बसस्थानकावर दहाच्या पुढं सर्व बसेस निघुन गेल्यावर जसा भोगी मिळाला तशी रात्र काढीत... आरामात देह अंथरणार्‍या  प्रवाशांचे आकारही बनतात. तुझ्या डोळ्यात निगेटिव्हज... आणि त्यांच्या हातापायांची वळणं... देहाची लय...अंगभूत वेदनांची जाणवते  तुला. मग त्या वेदनेचा वेध घेणार्‍या रेषा उमटवितात कागदार थकलेले भाग, तिच्या अंगावरची कोमलता व्यक्त करतात फुलं अशावेळी  तुझं रेखाचित्र इतकं काव्यमय होऊन गेलेलं असतं की, वाटतं रेषांनी संवाद करू पाहणारी ही एक कविताच आहे.
जगण्याचे संदर्भ, आकार, स्पर्श, वळणं, निद्रा, सौंदर्य... आपण जे अनुभवतो, जगतो ते सर्व तुझ्या रेषा पकडू शकतात सहज.  तुझ्या रेषा म्हणजे आमच्या अवतीभोवतीच्या संपूर्ण जीवनाचा बिलोरी आरसा, प्रतिबिंबं, माणसांची, झाडांची, चिमण्यांची, पाखरांची, फुलांची,  पानांची, मंगळसूत्राशी खेळत चुटुचुटु दुध पिणार्‍या तान्हुल्यांची. हीच आहेत तुझ्या चित्रकलेची विद्यालयं, महाविद्यालयं आणि विद्यापीठंही.
अहमदनगरच्या पोस्टाच्या काऊंटरवरही आल्या एखाद्यावेळी भेटायला रेषा तर आता टाळणं नाही तुझ्या हातात आणि  हातात असलेला पगार पुस्तकं विकत घेण्यात आणि चक्रमुद्रित घ्आदिमङ चे छापील दिवाळी अंक काढण्यात लावतोस तू सत्कारणी.  मिळवतोस दूर, दूर परदेशातही जिवाभावाचे मित्र, मैत्रिणी. अशी तुझी जगावेगळी कमाई ! तुझ्या रेखाचित्रांतील झाडांवर, पानांवर, फुलांवर,  दगडांवर आणि माणसांवरही येऊन बसणार्‍या इवल्या-इवल्याशा चिमण्या तुझ्या चित्रांना करून टाकतात सजीव, ह्या चिमण्या म्हणजे तर  चैतन्य तुझ्या चित्रांचे, प्राण तुझ्या रेषांचा. किती इमानदार असतात चिमण्या ! तू जेवतोस त्यांना ताटात घेऊन आणि त्या तुझ्या चित्रात  ओततात जीव स्वत:च्या इवल्याशा अस्तित्वानं.
तुझ्या रेखाचित्रांतील माणसांना नसतात चेहरे; पण अवतीभोवती डोळसपणे पाहिलं की दिसतात आम्हाला तुझ्या  रेखाचित्रातील माणसं जगताना, हिंडताना, झोपताना, तुझ्या रेखाचित्रांवर लिहिताना अर्थातच सुस्पष्टपणे ठाऊक आहे मला माझ्या जाणिवेचं  सामर्थ्य आणि मर्यादाही. त्या दोहोंवरही पारखून आणि कस लावूनच मी घ्वेगळेपणङ मागंपुढं ओळखलंही जाईल अंभोरेशैली म्हणून  आणि काळाच्या दगडावर उमटेल एक ठसठसीत रेघ... तेव्हा येणार्‍या पिढ्या सांगतील एकमेकांना त्या रेषेचं नाव-श्रीधर अंभोरे !

स्टुडिओ नसलेला चित्रकार : सतीश बडवे



                               


सर्व बाजूंनी विचार करून माणसाचं जगणं रेषांमधून उमटवणारा श्रीधर अंभोरे नावाचा माणूस तसा मुलखावेगळा. पण केवळ माणसंच नाहीत तर जंगलांवर,झाडांवर, पशुपक्ष्यांवर चिंतन करीत स्वत:चं जगणं अधिक समृद्ध बनवणारा आणि त्यांनाही रेषांमधून साकार करणारा श्रीधर म्हणजे जातिवंत साधुत्वाचा आविष्कारच म्हणायला हवा. फकिरी वृत्ती हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग. पण श्रीधरच्या छोटेखानी घरातली टापटिप नजरेत भरणारी. अखंड ब्रह्मचर्य त्यानं कधी स्वीकारायचं ठरवलं हे माहीत नाही, पण त्याच्या मनातली संन्यस्त वृत्ती बहुधा लहानपणापासूनच असावी. हे सारं वास्तव असलं तरी श्रीधर तसा माणसांच्या गराड्यात रमणारा. गराड्यात असूनही अलिप्त राहणारा. काहीसा एकान्तप्रेमी, घरभर वाचनसंस्कृतीच्या खुणा विखुरलेल्या. बहुधा असं एकही नियतकालिक नसावं, की जे श्रीधरच्या घरात सापडू नये. केव्हाही जा- चर्चा होणार ती वाङ्‌मयाबद्दलची. सोबतीला त्यानंच बनवलेला चहा. कुठल्या तरी रानावनातनं आणलेल्या मुळ्या टाकून केलेला. तो तसा उत्तम बावर्ची. त्याच्या हातची भाजी लाजबाब. सामिष आहार बनवण्यातला त्याचा हातखंडा असाच अपूर्व. मला नेहमीच प्रश्न पडतो की, हा माणूस रेषांकडे वळला कसा? कोणत्या रेघोट्या त्याच्या मनात रेंगाळत असतील? त्याच्या रेषांच्या वक्रतेतून व्यक्त होणारी भावना एकेरी असणं शक्यच नाही. माणूस म्हणून जगणं, माणूस भोवताली बघणं, माणूस म्हणून माणसाचा विचार करणं, निसर्ग आणि माणसाचा संवाद घडवणं हे काम तो आपल्या चित्रांमधून अगदी सहजासहजी करतो. तो त्याचा सहजधर्म आहे. या सहजधर्मी माणसाला ही बहुमिती रेषा कुठे गवसली असेल? तथागताच्या नि:संग होण्याचा वसा श्रीधरनं मिळवला खरा, पण रेषेपासून तो आजही अलिप्त होऊ शकलेला नाही. मग याला नि:संग कसं म्हणायचं?
                        ८३-८४ मध्ये नगरचे लोक पुलंना भेटायला जात. गप्पात विषय निघायचा; पुल विचारायचेतुम्ही नगरचे, मग नगरच्या अंभोरेंना ओळखता का?पण नगरच्या अनेकांना तेव्हा श्रीधर अंभोरे नावाचा चित्रकार माहीतच नव्हता. लोकांची चित्रकाराची कल्पना भिन्न होती. अंभोरे नावाचा चित्रकार फार मोठा असणार.त्याची अनेक पोर्ट्रेट असणार. भलामोठा स्टुडिओ असणार. लोक शोधत पोचायचे ते नगरच्या कापडबाजारातील पोस्ट ऑफिसात. सिटी पोस्ट ऑफीस हा श्रीधरचा पत्ता. कारकुनी ते पोस्टमास्तर हा त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास.
            अलीकडे श्रीधरने मुदतपूर्व सेवानिवृत्ती स्वीकारुन तिथूनही संन्यास घेतला आहे. आज श्रीधर कुठे असेल याची खात्री देता येत नाही. कारण भटकंतीची त्याची प्रचंड ओढ त्याला स्वस्थ कशी बसू देणार ? महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात तो कुठेही असू शकतो. कारण या संन्याशाचा (मित्र) परिवार खूप मोठा आहे. स्टुडिओ नसलेला हा चित्रकार 'प्रत्यक्ष' वास्तवातल्या स्टुडिओत कुठंही असू शकतो. याच्या स्टुडिओच्या कल्पनाच अशा जगावेगळ्या आहेत. तो मूळातच चौकटीत बंदिस्त राहू शकणार्‍यांमधला नाही. चौकटी तर त्याने केव्हाच्याच तोडलेल्या आणि आपल्या वर्तुळाचा परीघही रुंद केलेला.
            रामदास फुटाण्यांनी 'ऋतुराज' नावाचं एक मंडळ स्थापन केलं होतं. एका कार्यक्रमाला विजय तेंडुलकर आले होते. कार्यक्रमात तेंडुलकरांच्या हस्ते श्रीधरचा सत्कार झाला. 'चेहरे' नावाचा स्लाइड शो 'फाय फाऊंडेशन' मिळालं म्हणून त्यांनी सादर केला. त्यानिमित्तानं तेंडुलकर नगरला आले होते. श्रीधर पोस्टाच्या क्वार्टरमध्ये राहायचा. तेंडुलकर तिथेही गेले. त्यांनीच विचारलं स्टुडिओ असावा असे वाटत नाही का ?‘ नाही वाटलं कधी’, एवढंच श्रीधरचं उत्तर. चित्रकार म्हटला की, स्टुडिओ असणारच याला तडा देणारा असा हा श्रीधर...  त्याच्या मते, माझा स्टुडिओ माझ्या डोळ्यासमोर, आकाश, झाडं, डोंगरे, दर्‍या, अरण्य, जंगलात हिंडणं, साधुंची भेट घेणं हा त्याचा स्टुडिओ. या सार्‍यांना अनुभवणं. ही श्रीधरची व्यासंगाची थिअरी. म्हणून त्याचे चित्रांचे प्रयोगही वेगळे. आरंभीच्या काळात या प्रयोगांनाही कुणी बरं म्हटलं नाही. पण श्रीधरचं हे वेगळेपण ओळखणारे काही जण निघालेच. डॉ.गंगाधर पानतावणे यांनी काही तांत्रिक गोष्टी सांगितल्या. औरंगाबादेतील चित्राच्या साहित्याची माहिती दिली. ड्राइंग पेपर, पेंटिंग्ज, रेखाटनं याविषयी काही सांगितलं. ' हंस ' च्या अंतरकरांनीही सल्ले दिले. श्रीधरची कितीतरी चित्रं ‘अस्मितादर्श’, 'हंसया नियकालिकांनी छापली. श्रीधरला त्यातून बळ मिळत गेलं.
            श्रीधरच्या चित्रात वेदनेचं एक अनोखं रूप आहे. त्याच्या कोणत्याही चित्राला चेहरा नाही. हा चेहरा हरवलेला आहे. त्याची कहाणी ही अशीच अनोखी... श्रीधर विदर्भातला. त्याचं गाव चिखलगाव (ता.अकोला). पण श्रीधरचं गाव कोणतं हा प्रश्न कधीच महत्वाचा नव्हता. आजही नाही. कोणतंही गावं श्रीधरचं असू शकतं. पण त्याचं बालपण विदर्भात गेलेलं. मुळगावकरांची चित्र लहानपणीच त्यानं बघितली होती. त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्नही केला होता. श्रीधर जिथं राहायचा तिथं एक जमीनदार होता. बक्कळ जमीन असलेला. त्याच्या शेतात स्त्रिया निंदायला जायच्या. त्याने श्रीधरला सांगितलं की, माझ्या वडिलांचं पोट्रेट बनवून दे. श्रीधरनं पोट्रेट बनवलं. ते नेऊन द्यायला तो गेला तेव्हा लक्षात आलं की, हा मालक त्या स्त्रियांचा उपभोग घेतो. हे कळताच श्रीधरच्या मनात घृणा उत्पन्न झाली. त्यानं मालकाची घाणेरडी वृत्ती बघून पोट्रेट फाडून टाकलं. सुंदर चेहर्‍यांची चीड मनात उगवून आली. सुंदरता कुरूपही असते याचा अनुभव आला. सुंदरतेच्या कल्पनेविषयी चीड निर्माण झाली. सुंदर चेहर्‍यांचे विरूप दर्शन त्याला घायाळ करून गेले. सुंदरतेच्या कल्पनेविषयी अढी निर्माण झाली... हा एकच क्षण असा होता की, त्याच्या चित्रातला चेहरा हरवला, पुसला गेला. चेहरा नसलेली माणसं हातातनं उतरू लागली. श्रीधरमधला चित्रकार इथल्या व्यवस्थेने घडवला. कुरूप व्यवस्थेनं सुंदरता ही कुरूप असते याचा अनुभव दिला.
            अशा अनुभवातनं श्रीधर घडत गेला. आपण चित्रकार आहोत याची जाणीव त्याला नव्हतीच. काहीशी अ‍ॅबनॉर्मल अशी ही अवस्था होती. अ‍ॅनॉटॉमी पर्फेक्ट हवी याची जाणीव त्याला कधी झाली नाही. कितीतरी चांगली रेखाटने श्रीधरने फाडून टाकली... त्याला भुरळ घातली ती व्हॅनगॉगच्या चित्रांनी. कुणा प्रेयसीनं नाकारलेला हा चित्रकार. स्त्रीपासून मिळणारे दु:ख, तिचा नकार. ती वेदना व्हॅनगॉगच्या चित्रातून उमटली. त्याला रंगांची जोड होती. व्हॅनगॉगच्या चित्रातला सूर्यफुलांचा पिवळा रंग असाच अंगावर येणारा. वेदनेचं एक रूप व्यक्त करणारा. श्रीधरची वेदनाही तशीच. व्यवस्थेनं त्याला नाकारलं होतं. परिस्थितीनं गांजलं होतं. त्यातूनच श्रीधरमधला चित्रकार घडला. श्रीधरची वेदना रेषेतून उमटली. रंगविहीन, चेहरा नसलेली रेषा... त्या रेषेतून साकारलेली चित्रं श्रीधरनं कागदावर उतरवली. त्याची चित्रं सरसकट वाचता येणारी. पण बघणार्‍याला अंतर्मुख करणारी. वेदनेची बोच त्याच्या चित्रांतून साकारते. श्रीधरच्या चित्रांतली रेषा मौनाला व्यक्त करणारी. मनभर हैदोस घालणारी.
            श्रीधरच्या दृष्टीनं चेहरे फार कमी लोकांना आहेत. गांधी, आंबेडकर यांना स्वत:चा चेहरा आहे. पण बाकीच्यांचे काय? चेहरा, नाक, डोळे, हे फक्त शरीराचे आकार. सामान्यांना चेहरा असतो कोठे? माणूस तसा इम्बॅलन्स ! तो खराही असतो आणि खोटाही. माणसात एकवाक्यता असत नाही, हे श्रीधरनं अनुभवलं. हे त्याचं जाणवणं त्याच्या चित्रातनं उमटलं. म्हणून तर त्याच्या चित्रातनं चेहरा हरवला. अगदी हद्दपार झाला. खरे तर सरावाने चेहरे काढता येतात. ते त्याला शक्यही होतं ; पण बहुधा त्यानं ते टाळलं असावं. त्याला चेहराच नकोसा वाटला असावा. त्याच्या मनातला चेहरा सुबक, सुंदर कधीच नव्हता. तो होता वाकडातिकडा, बेढब. जंगलातली झाडंही असतात वाकडी आणि माणसंही तशीच...
            वाचनाचं अफाट वेड असलेला श्रीधर पण त्यांच्या चित्राच्या कल्पना वेगळया. कोळशानं चित्र रेखाटणारी छोटी  पोरं हा त्याच्या कुतूहलाचा विषय होता. एकदोन वर्षाची पोरं भिंतीवर कोळशानं रेघोट्या ओढतात आणि त्यातूनच  तयार होतं चित्र हा श्रीधरचा विश्वास. या चित्रांचे अर्थ त्याने समजावून घेतले. साहित्याची भाषा शब्दांची असते.  पण हे शब्दही रेषांच्या आकारातून तयार होतात. शब्दलेखन ही चित्रांचीच  चिन्हव्यवस्था असते असं श्रीधरच मत.  माणसाच्या जन्माच्या क्षणापासून त्याचे नाते जुळते ते स्वरांशी. जन्मल्याबरोबर रडणे हा त्याचा पहिला स्वर. नंतरची भाषा हावभावाची . या विकासाच्या काळात निसर्गातले विविध आवाज तो ऐकतो. या ऐकण्याला आकार देण्यातून चित्रकलेचा जन्म झाला असावा, हे श्रीधरचं तत्त्वज्ञान. लहान मुले घरातल्या भिंती रंगवून ठेवतात, ती त्यांची चित्रांची भाषा असते. मुलं रेषांची भाषा बोलत असतात. ती त्यांची निर्मितीप्रक्रिया असते. लहानगा जीव भिंती खराब करतो म्हणून आईबाप भिंती पुन्हा रंगवतात आणि लहानग्यांच्या  निर्मितीवर पाणी फेरले जाते, याचे दु:ख श्रीधरला होते. श्रीधर हा असा वेगळ्या मुशीतला.... वेगळा विचार करणारा.... विदर्भातल्या त्याच्या घरासमोर बाभूळबन होंत. भलतंच दाट होतं ते. बाभळीच्या पानांचा हिरवा रंग त्याच्या डोळ्यात भरायचा. मनात दाटायचा. वावटळ सुटली की बाभळीच्या फांद्या एकमेकांवर आदळायच्या. झिप-या झालेल्या केसासारख्या दिसणा-या फांद्याची हालचाल त्याच्या मनात घर करायची. मेस्कामाय, मरीमायच्या समोर घुमणार्‍या बाया या बाभूळबनात आहेत असं वाटायंच त्याला. त्यांची भीती मनात खोलवर रुतायची. झोपल्यावरही बाभळीच्या फांद्या डोळ्यात फेर धरायच्या..... पावसाळ्याच्या दिवसात ढोर मेलं की, दारावरून त्याला ओढत बाभूळबनात नेलं जायचं. त्यांच्या मागे मग कुत्री जात. आभाळात गिधाडं, घारी घिरट्या घालायच्या. पाखरांची जत्रा भरलेली असायची. बाभुळबन मग हललेलं दिसायचं. मेलेल्या ढोराचं मांस खाण्यासाठी गलका झाल्यानं बाभूळबन थरथरुन जायचं. सारं सामसूम झाल्यावर बाभूळबन साधूसारखं वाटायंच. उन्हाळ्याच्या दिवसात बाभूळबनाची श्रीमंती संपायची . पान झडलेली असायची . बाभळीची खोडं उघडीवाघडी दिसायची. बाभळीवर बसलेली पाखरं मोजता यायची. श्रीधरच्या बालपणात हे सारं दृश्य त्याच्या नजरेनं साठवून ठेवलं. माय जिथं भांडी घासायची तिथूनच श्रीधर कोळसा उचलायचा. डोळ्यात फिरणार्‍या बाभळीच्या रेघोट्या....काळ्या काळ्या आईचा मारही खाल्ला त्यासाठी. कुणी सांगायचं त्या मायला की, श्रीधरला शाळेत घाला. लहानशी पाटी आणून द्या मग तो कशाला भिंत खराब करेल? पण मायचं म्हणणं अजिबातच खोंट नव्हत. बाभळीनं त्याला पुरतं झपाटल होतं. वाळलेली बाभळीची झाडं ,त्यांच्या उघड्याबोडक्या फांद्या,त्यांचे चित्रविचित्र आकार श्रीधरच्या मनात कोरले गेले होते. त्यातल्या कितीतरी रेषांना श्रीधरनं आपल्या चित्रातनं साकार केलं. या बाभूळबनानं त्याला रेषांचे कितीतरी आकार दिले... त्याची रेषाही तशीच थरथरणारी, आक्रमक आणि प्रवाहीसुद्धा. पुढे वाचनाच्या परिणामातून ती अधिक गडद झाली असेल; पण लहानपणातच ही रेषा त्याच्या हाताला चिकटली ती कायमची. त्यात परिपक्वता येत गेली. रेषेवरची हुकुमत कायम  झाली. ही रेषा त्याच्यापासून हलली नाही.ती झुलत राहिली. इतरांना झुलवत राहिली. श्रीधर या रेषेमध्ये आकंठ बुडून गेला...
‘आदिम’ अनियतकालिक हा श्रीधरच्या कल्पकतेचा आविष्कार होता. त्याच्या नेणिवेतले कितीतरी उन्मेष‘आदिम’ मधून प्रकटले. ‘आदिम’ साठी श्रीधरनं जीवाचं रान केलं. सायक्लोस्टाईलवरची रेखाटनं हा ‘आदिम’ मधला श्रीधरचा ऐतिहासिक पहिला प्रयोग मानावा लागेल. पोस्टातल्या खर्डेघाशीबरोबरच  वाचनाच्या वेडाने झपाटलेल्या श्रीधरने व्यासंग सतत वाढता ठेवला. हा त्याचा व्यासंगच ‘आदिम’च्या कामाला उपयोगी आला.‘आदिम’मुळे श्रीधरचा अनेकांशी संबंध आला. सर्व क्षेत्रातल्या, कलेतल्या लोकांकडे ‘आदिम’ जात असे. साहजिकच त्याची चित्रे या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचली. ब्लॉकऐवजी स्टेन्सिलने चित्रं काढून प्रिंटिंग करायचे हा प्रयोग श्रीधरने सुरू केला. त्यानंतरच महाराष्ट्रात चित्रांसह आणि रेखाटनांसह नियतकालिके सुरू झाली. वाङ्‌मयीन नियतकालिकांसाठी चित्रे काढायला श्रीधरचा हात कधी आखडला नाही. प्रसंगी त्या नियतकालिकाच्या दर्जाचाही विचार त्याने कधी केला नाही. सामाजिक बांधिलकीचा विचार त्याच्या दृष्टीने कायम महत्त्वाचा होता.वेगवेगळ्या थरातली माणसे ‘आदिम’ मधूनच जोडली गेली. अगदी अलीकडे प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील पुरस्काराने श्रीधरला सन्मानित केलं, तेव्हा ‘आदिम’ च्या परिवाराला अंत:करणातनं भरून आलं. त्याच्या दीर्घ कालावधीतल्या कामाचं झालेलं ते कौतुक होतं. एका प्रयोगशील चित्रकाराला मिळालेली ती दाद होती...

                                                     


            श्रीधरने मनीऑर्डरची पावती फाडण्याच्या पट्टीचा आधार घेऊन रेखाटने तयार केली होती. पोस्टाच्या रुक्ष जगातही श्रीधरने स्वत:तला कलावंत मरू दिला नाही. चित्र हा त्याचा श्वास होता आणि आजही तसेच आहे. पण त्याच्या चित्रांचा वेग आता मंदावला आहे. ‘आदिम’ च्या दिवसांमधला श्रीधर झपाटलेलाच होता. त्याच्या अनिर्बंध भटकंतीने त्याला कितीतरी आकार पुरवले. मनात खोलवर रुतलेलं बाभूळवन, मेळघाट-ताडोबाच्या जंगलातलं आणि  विविध ठिकाणच्या अभयारण्यातलं मुक्त भटकणं, जंगलातल्या जगण्याला डोळ्यात साठवणं यातून निसर्गातला झाडांचा फॉर्म श्रीधरनं चित्रात आणला. झाडांचे अनंत आकार त्याने रेषेतून साकारले. निबच्या पेननं वहीच्या शेवटच्या पानावर हेच आकार कधीकाळी त्याने उमटवले होते. पुढे त्याच्यात परिपक्वता येत गेली. निर्मिती आणि निसर्गाचा संबंध तसा पुरातन. सारेच धर्मसंस्थापक, साधू जंगलात जाऊन चिंतन करणारे. श्रीधरही त्यांच्यासारखाच अशाच भटकंतीत.आलमेलकरांची चित्रंही श्रीधरच्या बघण्यात आली. आदिवासींची सौंदर्यवादी चित्रं होती ती. त्यांनी संकलित केलेली गीतंही वाचण्यात आली. मध्यप्रदेशातल्या ‘भीमबेटका’ च्या गुहांमध्ये जाऊन आदिमानवाची रेखाटनं श्रीधरने बघितली. चाळीसगावच्या केकी मूस यांचीही भेट घेतली. अशा कितीतरी गोष्टी. या सार्‍यातून व्यासंग वाढला. श्रीधरच्या आशयगर्भ रेषांना त्यामुळेच अर्थपूर्णता लाभली. चित्राच्या गाभ्यातली ही अर्थपूर्णता ‘आदिम’ मधून आणि अन्य नियतकालिकांमधून उमटत गेली...
            ‘आदिम’ च्या माध्यमातून श्रीधरची चित्रे अनेकांपर्यंत जाऊ शकली. त्याच्या रेषांच्या वेगळ्या आकारांमुळे त्यांच्या चित्राविषयी अनेकांची अनेक मते होती. काहींना त्याची चित्रे निगेटिव्ह वाटली. पण अनेक दिग्गजांनी ही चित्रे उचलली. भालचंद्ग नेमाडे हे आदिमचे पहिले वर्गणीदार. श्रीधरची चित्रे बघून त्यांनी वर्गणीची मनीऑर्डर श्रीधरला पाठवली. त्याचे कौतुक केले. प्रोत्साहन दिले. स्टुडिओ नसलेल्या श्रीधरने मग मागे वळून बघितलेच नाही. १९८३ ला फाय फाऊंडेशनचे पारिपोषिक श्रीधरला जाहीर झाले. चाकोरीबाहेरचे काम  करणार्‍या व्यक्तीला त्याच्या कामातील वेगळेपणासाठी मिळणारे हे पारितोषिक. श्रीधरला मिळालेली ही भक्कम पोचपावती होती. आर.के.लक्ष्मण यांनाही याच वर्षी पारितोषिक मिळाले होते. महाराष्ट्राच्या चित्रकारांना हे पारितोषिक मिळण्यास इथूनच प्रारंभ झाला. त्यावेळी श्रीधर हा सर्वात कमी वयाचा चित्रकार होता. श्रीधरच्या कलानिर्मितीला मिळालेली ही केवळ पोचपावती नव्हती. आपण जे करतो ते योग्यच आहे, हा दिलासा त्याला लाभला. काम करण्याची उमेद वाढली. श्रीधरच्या आत आत असणारी ऊर्मी बळावली. १९८७ ला विजय तेंडुलकरांची ‘दिंडी’ सिरियल मुंबई दूरदर्शनने प्रसारित केली होती. त्यातला एक एपिसोड श्रीधरवर चित्रित झाला होता. तेंडुलकर खास त्यासाठी नगरला दोन दिवसांच्या मुक्कामाला आले होते...
            श्रीधरचं क्षेत्र विस्तारलं गेलं. आदिमच्या निमित्तानं श्रीधरमधला कवीही जागा झाला होता. त्याने कविता फार लिहिली नाही. पण त्याचं कवीमन चित्रातून उमटत गेलं. रेषांची लय अधिक गहिरी होत गेली. वेगळेपण जपणार्‍या नियतकालिकातून श्रीधरने रेखाटने केली. ‘अस्मितादर्श’ ‘हंस’, ‘प्रतिष्ठान, ‘युगवाणी’, ‘अनुष्टभ’,यातून श्रीधरची  कितीतरी रेखाटनं शोधता येतात. महाराष्ट शासनाचं दिवाळी अंकाचं पारितोषिक मिळवणार्‍या ‘शब्दालय’ च्या पहिल्या अंकाची मांडणी व रेखाटने श्रीधरचीच होती. हजारो रेखाटनं रेखाटणार्‍या श्रीधरची अपरिग्रहाची वृत्ती मात्र कायम राहिली. श्रीधरही सर्वस्वाचा त्याग करणार्‍या साधुसारखाच. स्वत:चीच चित्रे आणि रेखाटने जवळ नसलेला हा चित्रकार. कधी आवडली नाहीत म्हणून चित्रे फाडली. जी रेखाटने केली ती कुणासाठी तरी देऊन टाकली. म्हणजे मग हा पुन्हा मोकळा...
भटकंती करायला...

            चित्रकार खरे तर माणसात न मिसळणारा. स्वत:च्या मस्तीत डुंबणारा. रंगरेषांमध्ये हरवून जाणारा. पण श्रीधरच्या बाबतीत असं घडलं नाही. या संन्याशाचं लेकुरवाळं रूपही अनोखंच. संगीतातला राग असो, तबल्याचा ठेका असो, उंच उमटलेली लकेर असो, श्रीधरच्या मनात स्वर सतत रुंजी घालतात. कधीकाळी तो संगीतही शिकला. मैफिलींमधून रागदारीं आणि सुरावटही त्याने आपलीशी केली. अनेक कवींना जोडत कविताही अंतरंगात भिनवली. कवितांचे कार्यक्रम असो, एखादे संमेलन असो, नाहीतर कुणा मित्राच्या घरचं लग्नकार्य असो. श्रीधर असायलाच हवा असा सार्‍याच मित्रांचा आग्रह असतो. सार्‍या जातीधर्मात याचे मित्र विखुरलेले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगणारा हा चित्रकार. मित्रांच्या घरात तो केवळ मित्र असतो. स्वत:तला चित्रकार तो खोलवर कुठंतरी दडवून ठेवतो. वैदर्भीय ढंगातल्या त्याच्या गप्पा ऐकल्यावर समजते की, त्याची निरीक्षणं किती सूक्ष्म आहेत. माणसं वाचणारा हा चित्रकार. आपल्या मित्रांच्या घरात तो तसा ‘श्रीधरकाका’नाहीतर ‘अंभोरेकाका’म्हणून परिचित आहे. मित्रांपेक्षा मित्रांची मुलंमुली त्याच्या येण्याची वाट अधिक पाहतात. हा त्यांच्या चौकशा अधिक करतो. त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करतो. आठवण ठेवून कुणाला काय आवडते ते आणून देतो. याचं हे रूप मोठं लोभस आहे. कारण इथं तो चित्रकार नसतो. तो गर्दीतला कुणीतरी एक असतो. सामान्य माणसाच्या सामान्य गोष्टी त्याच्याबाबत खूपदा खर्‍या होतात. पांढरे स्वच्छ धुऊन इस्त्री केलेले कपडे घालणं याला आवडतं. पण खूप ठरवूनही त्याच्या पांढर्‍या कपड्यांवर जेवताना काहीतरी सांडतं. मग चेष्टेचा विषय म्हणून त्यावर गप्पा रंगतात. नगरच्या रस्त्यावर हा स्कूटर हातात घेऊन लोटताना दिसतो, तेव्हा लक्षात येतं की, हा पेट्रोल भरायला विसरलाय. मित्रांच्या घरातलं स्वयंपाकघर याची वाट पाहात असतं. हा तमाम मित्रांच्या घरात सार्‍याच वहिनींबरोबर विविध पदार्थांच्या रेसिपींवर गप्पा मारतो.‘अंभोरेकाकाबरोबरतुम्ही बाहेर पार्टीला जात असाल तर हरकत नाही’असं विधान याच्या प्रत्येक मित्राच्या बायकोचं असू शकतं. हा आपल्या नवर्‍याबरोबर असेल तर कुठलंच काळजीचं कारण नाही, असं याचं घराघरात खास वजन आहे. हा नेमका कोणत्या पातळीवर जगतो? हा याच्या मित्रांना पडलेला प्रश्न. कारण मित्रांसाठी तो मित्र असतो. मुलांसाठी काका असतो. मग हा चित्रकार केव्हा असतो? याला एकदा जाहीर बोलायला भाग पाडायचं म्हणून विद्यापीठाच्या एका रिफ्रेशर कोर्समध्ये बोलवलं. काही केल्या हा तयार होईना. फक्त अर्धा तास बोल. उरलेल्या वेळेत चित्रं दाखवू, चर्चा करू असं म्हणत याला कसंबसं घोड्यावर बसवलं. हा आला आणि मी वक्ता नाही. असं सांगत तीन तास बोलण्यात रंगला. व्याख्यान संपल्यावर ‘आता मी वक्ताही झालोय’म्हणत मिळालेल्या मानधनाचं सेलिब्रेशन मित्रांबरोबर करून मोकळा झाला. वक्ता म्हणून थेट विद्यापीठातच व्याख्यान देणारा हा... याला जगावेगळा नाही म्हणायचं तर काय?
            आरपार छेदणार्‍या रेषा, त्यांचे गहन, गहिरे रूप आणि त्यातनं प्रकटणारी वेदना यांना झेलत श्रीधर वाट चालतोय. खूप खाजगीत कधीतरी तो सांगतो बुद्ध, कबीर, आंबेडकर, गांधी, विनोबा यांच्या वाचनातून लक्षात येतं की, हे सारे ‘स्वयं’चा शोध घेताहेत. या सार्‍यांच्या विचारांचा प्रवाह माझ्या मनातून वाहतोय. मग लक्षात येतं की याला स्टुडिओ का नाही? आपला भोवताल हाच आपला स्टुडिओ असं मानणारा हा श्रीधर आहे. तो घरात असेल, जंगलात असेल, विपश्यनेत असेल, स्वयंपाकघरात असेल, मुलांच्या घोळक्यात असेल, पुस्तकांच्या मुखपृष्ठात असेल, पुस्तकांच्या वाचनात असेल, कुठल्याशा कार्यक्रमाच्या सजावटीत असेल नाहीतर रेखाटने रेखाटत बसलेला असेल... हा स्टुडिओच्या बाहेर कधीच नसतो. हा सदैव स्टुडिओतच असतो... याचा‘स्वयं’चा शोध चालू असतो. जे आत आहे तेच बाहेर आणि जे बाहेर आहे तेच आत... श्रीधर किती समजला हे सांगता येणार नाही. तो अनेकांना अनेक पद्धतीनं भावलाय. एक खरं तो कुठंही भेटो. तो जिथंही असतो तिथंच स्टुडिओ असतो तरीही हा मात्र स्टुडिओ नसलेला चित्रकार!
_______________________________

हंस’दिवाळी २०१० वरून साभार
_________________________

श्रीधर अंभोरे नावाचं चित्र : डॉ.किशोर सानप

                                                       

चित्रकला, मूर्तिकला, नृत्यकला, संगीतकला, साहित्यकला, वास्तूकला, तंत्रकला, जीवनकला असं कलेचं क्षेत्र कालानुरूप विस्तारत आहे. श्रीधर अंभोरे हा असामान्य किर्तीचा भारतीय कलावंत-प्रतिभावंत चित्रकार आहे, हे लोकांना सांगायची आज गरज नाही. श्रीधर हा खरेतर कलावंत. कलावंताजवळ काहीही नसलं तरी चालतं. परंतु कलेचं मन असणारे डोळे-कान-नाक-त्वचा-जिभ ही पंचेंद्रिये असावीच लागतात. हे सर्व प्रतिभेचं भांडवल श्रीधरजवळ विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. माझे सर्व भांडवल माझ्या चित्रांचेच, ही श्रीधरची कलासक्त भूमिका आहे. प्रत्येक कलावंताची एक स्वयंप्रकाशी भूमिका असते. आम्ही विधीचे जनिते केले नव्हे, असा असतो अस्सल कलावंत.

कलावंताला जात नसते. धर्मही नसतो. कलावंताचं वास्तव्य प्रदेशाच्या अवकाशात असलं, तरी त्याची दृष्टी अणूरेणूया थोकडा कलावंत आकशाएवढा, अशीच असते. चरांचरांत विहार करून जीवसृष्टीकडे समत्व-ममत्व भावनेनं पाहणारा कलासक्त आत्मा कलावंताच्या कलेचा जीव की प्राण असतो. कलावंताच्या मनात मानुषतेचा झरा असतो. सत्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता, अहिंसा, निर्भयता, दया, क्षमा, शांती, करुणा, अपरिग्रह, भक्ती ह्या मानुष मूल्यांचा उपासक असतो कलावंत. श्रीधरही अशा अभिजात कलावंतांपैकीच एक कलावंत आहे.

श्रीधरच्याही अंतह्नकरणात महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसाच्या हृदयात हजारो वर्षांपासून वास्तव्य करणार्‍या एकेश्र्वर म्हणजेच सर्वेश्र्वर सावळ्या परब्रह्माचं-विठ्ठलाचं वास्तव्य आहे. विठ्ठल हे वारकर्‍यांचं परमदैवत. मूर्तिकलेचा अप्रतिम आविष्कार. कलेचा साधक आणि उपासकही. कुण्याही कलावंताच्या प्रतिभेला पूर्वसूरींचा अभिजात वारसा लाभलेलाच असतो. कलावंत ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या पर्यावरणाचा आणि सांस्कृतिक भाषिक अस्मितांचाही खोलवरचा परिणाम कलावंताच्या कलासक्त मनावर झालेला असतो. श्रीधरचीही जडणघडण मराठमोळ्या सांस्कृतिक आणि वैचारिक संस्कारांच्या परिमाणातूनच झालेली आहे.
श्रीधरचा जन्म अकोला जिल्ह्यातील चिखलगांव या लहानशा खेडेगावी दि. २१ मार्च १९५२ रोजी झाला. पूर्वी शाळेचे नियम लक्षात घेवून किंवा मास्तर सांगेन त्या जन्मतारखेला शाळेच्या दाखलखारीजवर मुलामुलीचं नाव चढविण्याचा जमाना होता. खेडातल्या श्रीधरच्या वडलांनी-अंबादासजींनी श्रीधरचं नाव तर सांस्कृतिक महत्ता जाणूनच ठेवलं. परंतु शाळेत मात्र मास्तरांनी २१ मार्च १९४७ ही जन्मतारीख टाकली. अंबादास खरंतर अंबाईचा भक्त. मातृपूजक. आजोबा-फकिरा होते. वृत्तीनेही ते फकिराच होते. आई-कापूरा. कापूरासारखीच ती कुटुंबातलं दुह्नख पोटात घालून मुलांना जपत जोपासत वाढवत होती. कर्पूरासारखीच बिचारी आयुष्यभर मनातल्या मनात दुुह्नखभोगाला जाळत लेकरांच्या सुखासाठीच केवळ जगली. आजी जनाबाई तर साक्षात नामयाची जनीच.

अभंगांचा मुक्त आविष्कार असलेली जनाबाई आणि विठ्ठलाशी भांडण करून विठ्ठलरखुमाईचं एकरूप अस्तित्वच जणू. आजी जनाबाईंची वृक्षपूजा हेच खरंतर श्रीधरच्या वृक्षविपुल कलासृजनाचं आत्मतत्त्व आहे. वृक्षासक्त मन श्रीधरनं जपलं आणि आजीनं त्याच्या कलासक्त बालमनावर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे संस्कार केले. जगातलं चराचराचं पर्यावरण सत्य संत तुकोबांनी सतराव्या शतकातच जगासमोर मांडलं होतं,
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमें तेथे मन क्रीडा करी ॥
कथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरू ॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥
संत तुकोबांनी कलावंताच्या संत मनानं टिपलेलं चरांचरांतल्या जिव्हाळ्याच्या नात्याचं अनोखं आणि अनन्यसाधारण रूपधर्म मांडला. कलावंताचं मग तो कोणत्याही कलेचा उपासक आणि साधक असो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असतात आणि पक्षांचा सुस्वर कलावंतांसह माणसाचं जगणं सुंदर करतात. कलावंताला एकांत हवा असतो आणि एकांतातच सृष्टीच्या सृजनाचं रहस्य उलगडू लागतं. कलासक्त मन सृष्टीच्या चरांचरांत पक्षासारखं विहरू लागलं की, अंगासह मनाला पावित्र्याचा सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. पंचेंद्रिये चराचरातील जीवन सौंदर्याचा अनुभव घेतात आणि कलावंत सृष्टीसौंदर्याशी तादाम्य पावून जीवसृष्टीचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं व्यक्त करू लागतं. कलावंताचं सृष्टी सृजनात्म मन हेच त्याचं घर असतं. आकाश मंडप आणि पृथ्वी हेच त्याच्या विहाराचं विसाव्याचं आसन असतं. मनाची रमणीय क्रीडा सुरू असते आणि देहधर्माचा उपचार गळून पडतो. वार्‍याचा नादही भक्तीची गाज बनतो. विठ्ठलरूपाशी म्हणजेच सृष्टीरूपाशी कलावंत एकरूप होतो. सृष्टीच्या दर्शनानं चित्तवृत्ती प्रसन्न होवून हरिरूपाचं-सृष्टीरूपाचं ऊर्जातत्त्व कलावंताला जगवतं. कलावंताचा मनाशी सतत संवाद सुरू असतो. कलेच्या सृजनाची सार्वत्रिक आणि सार्वकालिक कलामीमांसा तुकोबांनी या एका अभंगातून मांडली आहे. ती आजही कालसापेक्षच आहे.
सृष्टीच्या दर्शनानं जगण्याचं हाती लागलेलं सत्य, मनाच्या मुशीत उजाळा देवून निखळ जीवनसत्ये सांगण्याचा आणि व्यक्त करण्याचा कलावंताचा धर्म असतो. आपुलाचि वाद आपणाशी करीत, कलावंत कलासृजनाचं व्रतस्थ कार्य करीत असतो. संत तुकोबांनी सर्वच कलावंतांना कलेचा धर्म शब्दांतून सांगितला, तो प्रत्येक कलेच्या केंद्रस्थानी अध्याहृत असतो. श्रीधरच्याही रेषा संत तुकोबांनी सांगितलेलाच कलाधर्म व्रतस्थपणे सांगतांना दिसतात. संत तुकोबा जगातल्या सर्वच कलांच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला दिसून येईल. श्रीधरही त्याला अपवाद नाही.

श्रीधरची कौटुंबिक पार्श्र्वभूमी हीच खरेतर त्याच्यातल्या कलावंताचं मन जपणारी जोपासणारी भरणपोषण करणारी आहे. तिला खरेतर भारतीय पौराणिक आणि आधुनिक, सांस्कृतिक; बुद्ध, संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरादी पुरोगामी आणि मानवतावादी विचारांचीही भूमी लाभलेली आहे. संक्रमित आणि संमिश्र कृतिशील परंपरेच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कलावंत नजरेची जाणही त्याला आहे. श्रीधरची चित्रं, रेखाटणं त्याची साक्ष देतात. श्रीधरचे आजोबा फकिरा हे लढवय्ये होते. वखराची फास त्यांनी मोडली आणि त्याचा भाला आणि तलवार करून ते रणांगणात सैनिक बनले होते. आजी जनाबाई ही वृक्षवल्लीची पूजा करायची. श्रीधरच्या चित्रातील शस्त्र आणि झाडं, जंगल, रानवेली, पशूपक्षी, सुगरणचे खोपे आदींवरून त्याच्या मनावर बिंबलेली सांस्कृतिक महत्ता जाणवते
.
श्रीधर माणूसवेडा आहे. सतीश बडवेंनी म्हटलं की, श्रीधरच्या चित्रांत माणसांचे चेहरे दिसत नाहीत. चेहरे हरवलेली माणसं श्रीधरच्या चित्रांचा आत्मा आहे. चेहरे गमावलेली आणि सौंदर्याचं करूपपण श्रीधरच्या शोधाचा आणि चित्रांचा विषय आहे. खरं आहे. माणसांना चेहरे असतात. बालपणी मिळालेली निरागसता चेहर्‍यांतून पुढे हरवत जाते. माणसंच माणसांची वैरी होतात. श्रीधरला चेहर्‍यांची निरागसता वृक्षवल्लीत दिसते. वृक्षांच्या आकारातून तो माणसांचे चेहरे आणि जगण्याचं श्रेयस शोधू पाहातो. पण ते हाती लागत नाही. कलावंत आपल्या अनुभवाशी प्रामाणिक असला की तो सत्य आणि निर्भयतेचा शोध घेवू लागतो. पण चेहर्‍याचं सौंदर्य हरवलं ते वृृक्षांच्या आकारात तरी मिळतं काय? याचा श्रीधरचा सुरू असलेला शोध काही संपलेला नाही. तो निसर्गात आणि झाडावेलीत आणि काटाकुटात बाभूळबनात हरवलेले चेहरे आणि हरवलेल्या चेहर्‍याचं दुह्नखद जगणं शोधू पाहातो. दुह्नख आणि करुणा नेहमीच अक्षर कलाकृतींना जन्म देणार सृजनाचं तत्त्व असतं. जगातल्या सर्वच कला आणि कलावंतांना सृजनाचं हेच आदिम तत्त्व खूणावत असतं. कलेचं खरंतर दुह्नख आणि करुणा हेच सृजनशील तत्त्व आहे. श्रीधरचाही सृजनशोध याच पाऊलवाटेनं चालू आहे. दुह्नख आणि करुणेची अनाहत गाज श्रीधरच्या चित्रांतून रसिकांना अनुभवता येते.

श्रीधरला बालपणी त्याचे वडील कबिराचे दोहे ऐकवायचे. पुस्तकं वाचण्याचा नादही त्यांनीच लावला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग सामान्य माणसाची स्वगतं म्हणून स्वीकारले होते. बहुजन नायकमध्ये त्यांनी तुकोबांचे अनेक अभंग कोट केले आहेत. बाबासाहेबांनी सन्‌ १९५६ मध्ये दलित धर्मक्रांती करून आपल्या सर्व दलित बांधवांसह हिंदुधर्माचा त्याग केला. भौतिक आणि विज्ञानवादी दृष्टिकोण रूजविणारा बौद्ध धम्म स्वीकारला. स्वीकारानंतर दलित बांधवांनी हिंदुधर्माच्या घरातल्या सर्वच खाणाखूणा भिरकावून दिल्या. श्रीधरच्या घराण्यात दोनतीनशे वर्षांपासून कर्नाटकी बनावटीचा गोमटेश्र्वरसदृश्य नंदी आणि शंख होता. नंदीकडे श्रीधर बालपणापासून कलासक्तपणे बघायचा. आजीनं झाडांची बांधलेली पूजा बघायचा. शंख तर तो सांभाळू शकला नाही. परंतु नंदी मात्र त्यानं वडलांना नदीत विसर्जित करू दिला नाही. आजही नंदीचं ते कर्नाटकी सावळं लेणं त्यानं आपल्या संग्रहालयात जपून ठेवलेलं आहे. भाला, तलवार, झाडं, वेली, झाडांची मूळं, पशूपक्षांची रूपं, बैल, नंदी अशी मुक्या प्राण्यांची कारुण्यचित्रे श्रीधरच्या कलेचा विषय का बनली ?  त्याचं रहस्य श्रीधरच्या मनावर बालपणी बिंबलेल्या आई-वडील-आजी-आजोबा यांच्या सांस्कृतिक आणि कलासक्त जगण्यावागण्यातून उलगडत जातं.

कलावंताला कलेच्याही मर्यादा नसतात. कला ही खरेतर जगातल्या सौंदर्याची पूजक असते. कलावंताला प्रतिभेचा तिसरा डोळा असतो. प्रतिभेच्या तिसर्‍या डोळ्यांतून टिपलेल्या आणि मनाच्या मुशीत पाजळून हाती आलेल्या अनुभवसत्याचा कलासक्त आविष्कार करीत असतो तो कलावंत. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात खूप कलावंत कलेची साधना करून, कलात्मक अपत्यांना जन्म देण्याच्या तयारीत गुंतलेले असतात. परंतु अस्सल कलावंताचं अपत्य आणि साधनासक्त कलावंताचं अपत्य यात अंतर पडतंच. ते चटकन लक्षातही येतं. म्हणूनच कलेच्या प्रत्येक क्षेत्रात अभिजात जातिवंत प्रतिभावंत कलावंत आपल्या कलेची छाप जगावर उमटवून आपल्या कलाविष्काराला चिरंतन अक्षर अजरामर रूप देतात. श्रीधरची रेखाटनं, चित्रं, आदिम अनियतकालिकात रेषांचे त्याने केलेले प्रयोग, पोस्टात नोकरी करून नगरच्या वास्तव्यात त्यानं केलेलं जिवंत चित्रांचं रूपडं; केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध जगाला भुरळ पाडणारं आहे. श्रीधरला सन्‌ १९८३ मध्येच त्याच्या कलाविषयक योगदानाचं चिज करणारं फाय फाऊंडेशन, इचलकरंजीचा मोठा प्रतिष्ठेचा सन्मानही मिळाला. पदम्‌श्री विखे पाटील पुरस्कारासह अनेक मानसन्मान श्रीधरला त्याच्या कलेसाठी मिळाले.
श्रीधर हा सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा विषय असतो. विजय तेंडुलकरांनी दिंडी या मालिकेत श्रीधरचं कलावंतपण उभं केलं. पुल, रावसाहेब कसबे, रामदास फुटाणे, डॉ. मंचरकर, श्रीकृष्ण राऊत, जयराम खेडेकर, संजिवनी तडेगावकर, लोकनाथ यशवंत, रमेशचंद्र कांबळे, शिवा इंगोले, सुखदेव ढाणके, अशी दिग्गज कलावंत मंडळी श्रीधरचं भरभरून कौतुक करणारी आहे.

श्रीधर हा माणूसवेडा माणूस. सर्वच क्षेत्रातील आणि सर्वच गावातील मोठा मित्र परिवार त्याच्या जगण्याचं केंद्र बनलेला आहे. श्रीधर हे खरंतर एक अनाकलनीय चित्र आहे. अनेकांना या चित्राचं कोडं उलगडत नाही. श्रीधर आता स्वेच्छानिवृत्ती घेवून गावोगाव हिंडत असतो. त्याच्या पायाला भोवरा आहे. तो कधीच एका गावात नसतो. तो कधीही कुठेही आणि कोणत्याही गावात असू शकतो. मित्रांसाठी द्रवणार्‍या हृदयाचा तो स्वामी आहे. माणसं जोडण्याचा आणि मित्रांना जोडत जगण्याची त्याला मोठी हौस आहे. कुणालाही काही मागत नाही. कुणालाही काहीही देण्यास तो नेहमीच तयार असतो. श्रीधर स्वतह्न रूचकर स्वादिष्ट स्वयंपाक करून मित्रांना जेवू घालतो. सतत मित्रांना दिलासा आणि धीर देणारा माणूस, आत कुठेतरी स्वतह्नला शोधत असतो. स्वशोधाची ही प्रक्रिया खरेतर प्रत्येकासाठीच जीवघेणी असते. श्रीधरसाठी तर ती कलेचं माध्यम बनते. कलेच्या सृजनासाठी दुह्नखवेणा सहन करण्याची क्षमताही श्रीधरमध्ये अफाटच आहे.

श्रीधरनं लग्न केलं नाही. सतीशनं लिहिलं की कुण्या प्रेयसीनं त्याला नकार दिला. तो नकार पचवूनही बहुदा भरपूर वर्ष झाली. तो आता पासष्टीत आहे. परंतु चिरतारुण्य त्याच्या चेहर्‍यावर दिसतं. तो सदैव प्रसन्न. हसतमुख. प्रफुल्लित. उत्साही. अमृततुल्यच असतो. जिथं जातो तिथं अमृताच्या बिया पेरत जातो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तसं श्रीधरचं कलासक्त मन त्याच्या पंचेद्रियांसह अनुभव टिपत असतं. तोच अनुभवाचा ओतप्रोत चेहरा दृश्यरूपात आपल्याला दिसतो प्रसन्न, परंतु त्याची सर्वच चित्रे आर्त दुह्नखजलाचा धबधबाच वाटतात. श्रीधरचा खरा चेहरा केवळ त्याच्या चित्रांतूनच प्रकटतो. म्हणूनच श्रीधर खुद्द एक रेखाटन आहे. श्रीधर हे एक अनाकलनीय परंतु तीव्र दुह्नखकारुण्याचं रंगद्रव्य आहे. ते केवळ त्याच्या रेषांच्या आकारातूनच व्यक्त होतं. जसं दिसतं तसं नसतंच कलावंताचं मन आणि जगणंही. कलावंताचं जगणं असतं त्याच्यातल्या मातृत्वाचं सृजन. सृजनअपत्ये... श्रीधर नावाच्या चित्राचा शोध, असा त्याच्या आत्मचित्रांतूनच घ्यावा लागतो...
_____________________________________________
डॉ. किशोर सानप
कमला नेहरू शाळेजवळ, रामनगर, वर्धा-४४२००१ दूरध्वनी ९४२२८९४२०५, ९३२६८८०५२३
________________________________________________

एक निगर्वी कलावंत : श्रीधर अंभोरे : अशोक विष्णुपंत थोरात

                                       

सुप्रसिद्घ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचा आणि माझा परिचय खूप उशिरा म्हणजे २००० साली झाला. यशवंतराव चव्हाण  साहित्य प्रतिष्ठान व गंगा लॉज मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा पुरस्कार माझ्या घ्वादळातल्या प्रवासातङ या कवितासंग्रहाला  जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी मी गेलो तेव्हा टिळक स्मारक मंदिर खच्चून भरलेले. मंचावर सुशीलकुमार शिंदे, बबनराव पाचपुते,  रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे इ. राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी. प्रेक्षकांतही सारे नामवंत. अतिशय देखणा असा तो  कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर सार्‍यांच्या भेटीगाठी आटोपल्यावर एक कडक इस्त्री केलेली सुती कपडे घातलेली राजकारणी वाटावी  अशी व्यक्ती भेटायला आली. म्हणाली घ्मी श्रीधर अंभोरे. नगरला लवकर पोचायचे आहे, पुन्हा कधीतरी सविस्तर भेटूच. तुमचे अभंग  आणि कविता मात्र अस्वस्थ करून गेल्या.ङ आणि पाहता-पाहता शिरूभाऊ निघूनही गेले. नंतरच्या खाद्य, मद्य, पद्य उत्सवाला न थांबता.  खरं तर पुरस्कार मिळालेल्या माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरूभाऊंचे होते. त्यामुळे माझी नि त्यांची पूर्वओळख असायला हवी होती; पण  नव्हती. पंधरा सोळा वर्षांपुर्वी कवी लोकनाथ यशवंत त्यांच्याजवळ माझ्या कवितेविषयी बोलला. नंतर प्रेमात पडावे अशा सुंदर हस्ताक्षरात  शिरूभाऊंचे लहानसेच पत्र आले. त्यांनी माझ्या कविता अवलोकनार्थ मागितल्या होत्या. मी अर्थात कविता पाठविल्या नाहीत. उलट त्यांना,  मी माझ्या कवितांच्या बाबतीत कसा असमाधानी आणि उदासीन आहे ते कळविले. मी जे काही माझ्या कवितेच्या बाबतीत चिंतन मांडले  त्याला दाद म्हणून लगेचच त्यांचे पत्र आले. पुढे 199 साली नगरला अ. भा. साहित्य संमेलनात मी काव्यसंवर्धन पत्रिकेचा घ्मांडवा  बाहेरच्या कविताङ हा विशेषांक प्रकाशित केला. त्यावेळी त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला; पण भेट होऊ शकली नाही. मी खूप निराश  झालो आणि तेव्हाच निश्चय केला की काहीही झाले तरी जेव्हा केव्हा आपण काव्यसंग्रह प्रकाशित करू तेव्हा मुखपृष्ठ घ्यायचे ते श्रीधर  अंभोरे यांचेच. त्यावेळी ते सतत व्यग्र असायचे. पोस्टातील नोकरी. हंस, साधना,  राजस अशा प्रतिष्ठित दिवाळी अंकांसाठी रेखाटने. अनेक  ग्रंथांसाठी रेखाटने आणि मुखपृष्ठ. असे त्यांचे सुरू असायचे. शिवाय सुप्रसिद्घ अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत घ्आदिमङ हे  अनियतकालिक ते काढायचे. त्यावेळी नगरमध्ये अनुवादाच्या क्षेत्रात विलास गीते, कवी व संपादक अरुण शेवते, शब्दालय प्रकाशनाच्या  सुमती लांडे इत्यादींचे उपक्रम जोरात सुरु होते. शिरूभाऊ या सगळ्या चळवळींमध्ये मागे राहून पुढे असत. होय, पुढेपुढे करणे त्यांना  कधीच जमले नाही. कॅमेर्‍याची ऍलर्जीच जणू त्यांना. थोर नाटककार आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे वडील विजय तेंडुलकर यांनी  त्यांच्या घरी जाऊन, चित्रीकरण करून त्यांच्यावर एक डॉक्यूमेंट्री फिल्म काढली. तेव्हाही ते शांतपणे जमेल तेवढी त्यांना मदत करीत  होते. (नाइलाजाने). स्वत:विषयी ते कधीही कुणाला फारसं काही सांगत नाहीत. अत्यंत संकोची आणि मितभाषी असा त्यांचा स्वभाव आहे;  पण आमच्यासारख्या मोजक्या मित्रांमध्ये ते फारच खुलतात. ते बोलत असतात आणि घरातील लहान-थोर मंडळीत तल्लीन होऊन ऐकत  असतात. आम्ही अनेकदा त्यांना म्हणतो घ्तुम्ही एकपात्री प्रयोग सुरु करा, तुफान चालेल,ङ त्यांच्याकडे सहजसुंदर अशी कथनशैली आहे.  अनुभवाचे समृद्घ रसायन आहे; पण हे सारे खाजगी मैफलीपुरतेच मर्यादित आहे. शिरूभाऊंनी मित्र परिवार वाढू नये याची फार काळजी  घेतली असावी. म्हणून त्यांचे चाहते शेकडो असले तरी मित्र मात्र मोजकेच आहेत. शिरूभाऊंना घर असले तरी कुटुंब नाही. लग्न न  करण्याचे खास असे काही कारण नाही. राहिले, राहून गेले ! पोस्टातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्रभर सारखे फिरत असतात. ते  जिथे रमतात अशी घरे फार थोडकी आहेत. कल्याणचे प्रसिद्घ नाटककार वामन पतके, नगरचे रविंद्र सातपुते, औरंगाबादला डॉ. सतीश  बडवे, जालन्याला वहिनी, पुतणे, अकोल्याला डॉ. श्रीकृष्ण राऊत, अमरावतीला मी आणि यावलीकर, शेवटी नागपूरला लोकनाथ यशवंत असे  त्यांचे शेड्यूल असते. वर्षातून चार-पाच वेळा हे घडत राहते. याला कारण त्यांचे मुळगाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील चिखलगाव. हे प्रसिद्घ  वर्‍हाडी कादंबरीकार बाजीराव पाटील (थोरात) यांचेही गाव. या गावाला ते नियमित भेट देत राहतात. म्हणून आमच्याही भेटी घडतात. ते  दौर्‍यावर आले की, आमच्यापेक्षा आमच्या बायका-मुलांनाच जास्त आनंद होतो. कारण आल्यावर ते पहिल्यांदा किचनवर पूर्ण ताबा  मिळवतात. बायकांना आराम मिळते म्हणून, मुलांना नवलाईचे पदार्थ खायला मिळतात म्हणून सारे आनंदी असतो. मग रात्रभर आमच्या  गप्पा आणि धुराची वलये... जगातले साहित्य, संगीत, चित्रपट, नाट्य यातील सर्वोत्तम काय ते मला लोकनाथ यशवंत यांच्यामुळे कळते  आणि देशातले शिरूभाऊंमुळे. ते गात नसले तरी शास्त्रीय संगीताची त्यांना उत्तम जाण आणि आवड आहे. ते अबोल आणि बुजरे  असल्यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती अफाट आहे. म्हणूनच अनेक व्यक्तींच्या लकबी आणि स्वभाव यांचे सहज दर्शन ते गप्पांच्या ओघात  घडवतात. मात्र, त्यात टिंगलटवाळीचा सूर कुठेही नसतो. स्वच्छतेचे ते फार भोक्ते आहेत. अनेकदा ते छुपे गांधीवादी असल्याचा मला संशय  येतो. ज्यांच्याकडे मुक्कामाला उतरतील तिथले टॉयलेट, बेसिन अगदी लख्ख करून ठेवतील. एकदा या स्वच्छता प्रकारामुळे त्यांच्या  घरमालकाला त्यांचा संशय आला आणि भीतभीतच घरमालकाने त्यांना जात विचारली. समाजाच्या मानसिक स्वच्छतेचीही ते तेवढीच  काळजी वाहतात. म्हणूनच आमच्या गप्पांमध्ये अनेक सामाजिक विषय विविध दृष्टिकोनातून चर्चिले जातात. शिरूभाऊंचे अजून एक  स्वभाववैशिष्ट्य अलीकडे जाणवले ते म्हणजे त्यांची असंग्रही वृत्ती. किमान गरजेपुरत्या वस्तु ते बाळगतात. म्हणूनच अहमदनगच्या  त्यांच्या छोटेखानी फ्लॅटवर सध्यातरी म्हणावी तितकी पुस्तके नाहीत की त्यांनी काढलेली चित्रेही. अगदी पुरस्कार किंवा मानचिन्हेसुद्घा  नाहीत. ‘फाय फाऊंडेशन’ सारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार एकेकाळी त्यांना मिळाला. तोही अजून त्यांनी जपून ठेवला नाही. आता पंचवीस  हजार रुपयांच्या जालना येथील ‘अजिंठा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. बघूया शिरूभाऊंच्या वृत्तीत काही बदल  होतोय का ते.

कलावंत आणि मैत्री : धनंजय गोवर्धने

                                                 
सुमारे चाळीस वर्षापुर्वी मराठी साहित्यात एक साचलेपण आलं होतं. हळूहळू शिक्षणाचा प्रसार वाढला, शिक्षण कोणा एका  विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिली नव्हती, अन्य समाजाचे लोक शिकू लागले होते, लिहू-वाचू लागले होते आणि त्यामुळंच तत्कालीन मराठी  साहित्यात व्यक्त होणारी वेदना ही त्यांना सहवेदना वाटत नव्हती, आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचं साहित्य जगाचं लक्ष वेधून घेत होतं, मराठी  साहित्यात नामदेव ढसाळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दलित साहित्याच्या वेगळेपणाची जाणीव करून दिली होती.  मध्यमवर्गीय  जाणिवांना हे सारं नवं आणि असह्य होतं. घ्सत्यकथाङ ही वेगळी वाट निर्माण करता-करता नि एक चाकोरीबाहेरची नवी चाकोरी निर्माण  झाली होती. त्यावेळी घ्सत्यकथेतङ साहित्य छापून आलं म्हणजे स्वत:ला कृतकृत्य मानणारे अनेक होते. नवीन अनुभव आणि  वास्तवातली दाहकता यामुळं ते व्यक्त करणारी नवी परिभाषा निर्माण होऊ लागली. ती तत्कालीन वाङमयीन मासिकांना सहन होत  नव्हती. ती त्यांच्या पचनी पडत नव्हती, तेव्हा आजच्यासारखा वर्तमानपत्रांच्या साहित्य, शास्त्र, कला, विनोद यांच्या पुरवण्या निघत  नव्हत्या. त्यामुळं हे नवीन उन्मेष व्यक्त होण्यासाठी अनियतकालिकांची गरज भासू लागली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून  अनितकालिकांच्या चळवळी चालू झाल्या. त्यात आजच्या आघाडीच्या प्रथितयश अनेक लेखक, कवी, चित्रकारांचा सहभाग होता. कारण  तत्कालीन मासिक/दिवाळी अंक यात छापलेल्या साहित्याचं चित्र असे, त्या साहित्याला आपल्या रंगरेषांतून व्यक्त करण्यासाठी चित्रकारांनी  प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत.
त्या सुमारास सुभाष अवचट यांनी कथा, कविता यांच्या रेखाटनांत वेगळे प्रयोग केले. आशयाला पकडण्याचा प्रयत्न केला.  कधी-कधी ते लेखाला, कवितेला वेगळी उंची देऊन गेले आणि त्यातूनच त्यांची एक वेगळी शैली निर्माण झाली. सुभाष अवचट हे मराठी  साहित्याचा (इलेस्ट्रेशनची) बोधचित्रांची चौकट मांडणार्‍यांपैकी एक महत्त्वाचे चित्रकार आहेत. मराठी अनियतकालिकात अहमदनगरहून  श्रीधर अंभोरे, चंद्रकांत पालवे, सदाशिव अमरापूरकर, अरुण शेवते आणि त्यांचे सहकारी मिळून ‘आदिम’काढीत असत, नंतर ‘दिंडी’,  ‘दृष्टी’ असे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्याच वेळी नाशिकमधून आम्ही घ्सहकारी उद्गारङ नावाचं अनियतकालिक काढत असू. ठाण्याहून  प्रा. रमेश पानसे हे घ्ऋचाङ काढीत असत अशोक शहाणे, मनोहर ओक आदी अनेक जण अनियतकालिके काढत असत; पण त्या सर्वांत  लक्ष वेधून घेत असत ती श्रीधर अंभोरेंची चित्रं.
श्रीधर अंभोरेंचा आणि माझा परिचय या अशा अनियतकालिकांच्याच चळवळीतून सुमारे ४० वर्षांपुर्वी झाला. या पार्श्वभूमीवर  श्रीधरच्या चित्रांचा अभ्यास करणं मला महत्त्वाचं वाटलं. श्रीधरचा जन्म चिखलगाव (जि. अकोला) इथं झाला. तत्कालीन व्यवस्थेनुसार तो  वाढला, सभोवतालच्या परिस्थितीचा संस्कार त्याच्यावर झाला; परंतु वडिलांची शिकवण, त्यामुळं तो शिकला, लहानपणी तो कोळशानंच  घराच्या भिंतीवर रेघोट्या काढून स्वत:ला व्यक्त करू लागला होता. पुढं जाणता झाल्यावर वाचू लागला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम  बुद्घ, कबीर, ओशो यांच्या वाचनामुळं त्याच्या विचारात एक प्रगल्भता येऊ लागली होती. पोस्टात नोकरी करीत असताना दररोज  वेगवेगळ्या माणसांशी संपर्क येत गेला. प्रकृती तितक्या विकृती, अनेक ठिकाणच्या बदल्या. त्यामुळं तो सतत माणसात वावरत राहिला.  माणसं वाचत राहिला आणि स्वत:ला चित्रातून व्यक्त करीत राहिला.
श्रीधरनं चित्रकलेचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. त्यामुळं त्यांच्या चित्रांत एक अनागरी सौंदर्य आणि लहान मुलाची  निरागसता आहे. त्याला स्वत:ला फिरण्याचा छंद आहे. त्यामुळं तो भरपूर फिरतो, निसर्गात रमतो आणि निसर्गातून मिळालेला आनंद तो  त्याच्या चित्रातून आपणाला देत असतो. त्याच्या चित्रात हा निसर्ग त्याचा असतो, त्याच्या चित्रात बाभळीची झाडं जास्त असतात. ती  त्याच्या सभोवती होती. त्या बाभळीच्या झाडांत, फांद्यात पाखरं अडकू लागली, पानं कमी, पाखरं जास्त होऊ लागली. बाभळीच्या  झाडांऐवजी देहाची झाडं कधी झाली कळलं नाही. आम्ही भेटलो की भरपूर बोलतो, फिरायला जातो, बोलताना कोणताही विषय वर्ज्य  नसतो, संगीत, चित्र, शिल्प, सिनेमा, साहित्य, कला, माणसं, स्वयंपाक अशा अनेक विषयांवर आम्ही कधी - कधी रात्रभरही बोलतो.
श्रीधर बोलका आहे. तो पटकन संवाद साधू शकतो. महाराष्ट्रात अशी अनेक घरं आहेत तिथं तो केव्हाही जातो आणि त्या  घरचा होतो. विशेषत: लहान मुलांशी त्याचं छान जमतं, तो आला की आमच्याकडे पावभाजीचा/पुलावाचा खास कार्यक्रम असतो. तो नकला  चांगल्या करतो. त्याला गाणं चांगलं कळतं. त्यानं बरंच चांगलं वाचलेलं आहे. अनेक मासिकं त्याच्याकडे येत असतात. दलित चळवळीच्या  कार्यकर्त्यांना तो हक्काचा वाटतो. प्रवासात नगरला त्याच्याकडे मुक्काम करून पुढं जाणारे अनेक लेखक, कवी, चित्रकार, कार्यकर्ते  महाराष्ट्रात आहेत. त्यात अनेक मान्यवरांचा समावेश आहे. या सार्‍यामुळं त्याचं व्यक्तिमत्व समृद्घ होत असतं आणि ते त्याच्या चित्रातून  जाणवत राहतं. अनियतकालिकाच्या अंकाला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा त्यानं एक पांगुळगाडा मुखपृष्ठावर काढला होता. त्यावेळी चित्र  छापणं हे खर्चिक काम होतं. त्यासाठी ब्लॉक करावा लागत असे. यावर उपाय म्हणून सायक्लोस्टाईलच्या मशीनवर त्यांनी अंक काढला  आणि स्टेन्सिल पेपरवर चित्र काढून ती छापली. हे अतिशय जिकरीचं, जोखमीचं काम होतं. दिवाळी अंकासाठीसुद्घा बटर पेपरवर चित्र  काढून ती छापली जायची, या पद्घतीत चित्राची दुरुस्ती करणं शक्य नसायचं, त्यावेळी श्रीरामपुरहून सुमती लांडे या घ्शब्दालयङ नावाचा  दिवाळी अंक काढीत असत, त्यासाठी त्यानं अशा पद्घतीची अनेक चित्रं काढली, घ्हसंङ च्या दिवाळी अंकात अनेक वर्षांपासून श्रीधर अंभोरे  आणि भ. म. परसवाळे यांची चित्रं येतात. सुमारे वीस वर्षांपुर्वी पडल्यामुळं माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आणि नाशिकच्या  सार्वजनिक वाचनालयाच्या दिवाळी अंकाचं काम चालू होतं. आम्ही श्रीधरला बोलावून घेतलं. तो लगेच आला आणि डाव्या हातानं काही  चित्रं काढली आणि श्रीधरनं चित्रं काढून तो अंक आम्ही पूर्ण केला. श्रीधरनं रंगीत चित्रं फार कमी काढली आहेत. काही वर्षांपुर्वी रंगीत  पेनच्या साह्यानं बिंदू पद्घतीची काही चित्रं त्यानं काढली होती; परंतु त्याची बहुसंख्य चित्रं ही काळ्या शाईनं काढलेली आहेत. त्याच्या  जगण्यातला एकटेपणा त्याच्या चित्रात जाणवतो. त्याच्या चित्रातल्या माणसांना चेहरेच नसतात. त्याबाबत त्याला एकदा विचारलं तर तो  म्हणाला की, ही माणसं समाजात वावरताना मला दिसतात. त्यांना चेहराच नसतो. मला त्यांची वेदना/ भावना जाणवते. श्रीधरच्या  चित्रातल्या माणसांना चेहरा नसतो; पण त्यांच्या देहबोलीतून ती जास्त व्यक्त होतात.  त्यातले काही परिस्थितीनं हतबल, अगतिक तर  काही हे सारे झुगारून देऊन उभे राहणारे, त्याच्या चित्रातला मोठा भाग हा स्त्री देहात व्यापलेला असतो. त्यात स्त्रीची अनेक रूपं बघायला  मिळतात. घ्आदिमङ च्या एका अंकावर त्यानं डोक्यावर गवताचा भलामोठा भारा घेऊन चालणार्‍या पाठमोर्‍या स्त्रिया काढल्या होत्या.  त्यांच्या डोक्यावर गवताचा भलामोठा गवताचा भारा असल्यानं डोकं दिसत नव्हतं; परंतु गवताचा भार त्यांच्या नितंबांवर जाणवत होता.  त्यांच्या कमरेला अडकवलेला विळा. त्याची बारीक निरीक्षणशक्ती दर्शविते, एका अंकावर अनेक कुत्रे पाठमोरे चाललेले आहेत. त्यांच्या  शेपट्या उंचावलेल्या आहेत, त्यांच्या वासना/भावना त्याच्या चित्रातून व्यक्त होत राहतात. त्याच्या चित्रातून मातृत्वाची भावना जाणवते.  त्याच्या अनेक चित्रात आई आणि मूल, कधी-कधी मूल तिच्या देहकार्याचा एक भाग होते, तर कधी स्तनपान करताना तिचं वात्सल्य  अनावर होतं. कधी त्याच्या चित्रात स्त्रीदेहाचा उत्सव मांडलेला दिसतो, तर कधी स्त्री देहाची दुखरी ठसठसणारी वेदना जाणवते. त्याच्या  चित्रात अनेकदा सिंहाचं, स्त्रियांचं अनावृत्त दर्शन असतं; पण ती उत्तान न वाटता गोठलेली वाटतात. त्यानं मुखपृष्ठासाठी काढलेल्या चित्रातून  मात्र परिस्थितीशी दोन हात करून प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याचा त्याचा आवेश कायम दिसत असतो. अनेक मुखपृष्ठांतून त्यानं  तळागाळातल्या दलितांचा नेमका आवाज आणि अवस्था चित्रात मांडलेली दिसते. त्याची रंगसंगतीही वेगळी असते. त्याच्या रंगसंगतीवर  वेगळा अभ्यास करून लिहायला हवं.
श्रीधर एक चांगला माणूस, चांगला मित्र, चांगला चित्रकार आहे. अनेक वर्षांपासून त्याचं चित्रं काढणं थांबलं आहे. त्याचा मित्र  म्हणून आणि चित्रकार म्हणून ही गोष्ट मला फार यातना देणारी आहे. त्यानं चित्रं काढावीत म्हणून मी त्याला अनेकदा विनंती केली,  बोललो, चिडलो; पण तो आत गोठल्यासारखा वाटतो, त्यानं चित्र काढावीत ही माझी निसर्गाकडे प्रार्थना आहे.

श्रीधर, परत एकदा उचल पालखी या दिंडीची : विलास शेळके

                                                   

श्रीधर अंभोरे या चित्रकार मित्राचा परिचय मला माझे दुसरे चित्रकार मित्र धनंजय गोवर्धने यांनी आम्ही नाशिकला घ्उद्गारङ  अनितकालिक काढत असू तेव्हा म्हणजे सन १९५५ च्या सुमारास करून दिला. तेव्हापासून गेली सदतीस वर्षे श्रीधरची व माझी मैत्री आहे.  माझ्या नोकरीच्या निमित्ताने आमच्या भेटी वारंवार होत नसल्या तरी जेव्हा होत, तेव्हा मधले दिवस-महिने-वर्षांचे अंतर नाहीसे होत असे.  सन १९९६ ते १९९९ या तीन वर्षांमध्ये माझी बदली नगरला कार्यकारी अभियंता म्हणून झाली होती. त्यावेळी आमच्या भेटी मात्र वारंवार  होत राहिल्या. तेव्हा खर्‍या अर्थने आमची जास्त ओळख झाली आणि मैत्रीचे भावबंध घट्ट विणले गेले. माझ्या नगरच्या वास्तव्यात  श्रीधरने नगरच्या साहित्यिक वर्तुळात नेले व कवी चंद्रकांत पालवे, विलास गीते, संजीवनी खोजे, नरेंद्र काळे यांच्या सोबतची कवि संमेलने  व कवितांवरील चर्चा या माझ्या काव्यसंचिताचा ठेवा बनल्या. याच काळात श्रीधरला इचलकरंजीच्या ‘फाय फाऊंडेशन’ चा प्रतिष्ठेचा  पुरस्कार मिळाला. अगदी तरुण वयात हा पुरस्कार मिळवणारा श्रीधर हा कदाचित पहिलाच कलावंत असावा. त्यावेळी नगरच्या आणि  एकूणच श्रीधरच्या साहित्यिक मित्रांनी त्याचे केलेले कौतुक मला आजही आठवते; पण या ‘फाय’ पुरस्काराने श्रीधर ‘हाय फाय’ झाला  नाही. श्रीधरचे पाय जमिनीवर होते आणि जमिनीवरच राहिले. या पुरस्कारामुळे प्रकाशात आलेला माझा मित्र नंतर अनंत पुरस्काराचा  धनी झाला; पण कोणत्याही मानाचा किंवा धनाचा लोभ न ठेवता त्याने आपली चित्रकलेची सेवा, आपली पोस्टातली रुक्ष नोकरी सांभाळून  चालू ठेवली. याच दरम्यान दूरदर्शनवर दर रविवारी होणार्‍या दिंडी या दर्जेदार कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी विजय तेंडुलकर व प्रिया  तेंडुलकर नगरला आले होते. तेंडुलकरांनी श्रीधरमधल्या चित्रकाराची “प्रतिभा’ ओळखून त्याची एक दीर्घ पण अनौपचारीक मुलाखत  घेतली आणि दूरदर्शनच्या पडद्यावर त्याची ‘प्रतिमा’रसिकांसमोर ठेवली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण त्यांनी श्रीधरच्या सरकारी  क्वार्टरमध्ये, छोट्याशा जागेत केले तर त्याच्या चित्रांच्या संबंधाने थेट गावाबाहेरील बाभूळबनातील घ्वेड्या बाभळीङ मध्ये श्रीधरला  गवसलेल्या रेषांच्या आकृतिबंधासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळींच्या झाडांमध्ये जाऊन केले. मी या चित्रीकरणाच्या प्रसंगाला  उपस्थित होतो. ते तीन दिवस तेंडुलकरांच्या सहवासात आणि प्रसिद्घी माध्यमांच्या झगमगाटात भारावलेले होते. तेंडुलकरांसारख्या दिग्गज  साहित्यिक-कलावंत श्रीधरला, त्याच्यातील कलाकाराला समजून घेत कसा फुलवत होता हे बघणे आणि आनंद सोहळ्याचा आपण एक  भाग बनून जाणे हे आम्हा मित्रांना एका पर्वणीसारखेच होते. नगरच्या वास्तव्यात श्रीधरकडे कोणी साहित्यिक, कवी  मित्र  आले  की तो  हमखास माझ्याकडे घेऊन येई, मग माझ्या घरी मित्रांसोबत साहित्य, त्यातही कवितांची घ्मैफीलङ रात्री उशिरापर्यंत रंगत असे. कवी प्रमोद  मनोहर कोपर्डे, किशोर पाठक, धनंजय गोवर्धने अशी कितीतरी त्यावेळी नवोदित असलेली मंडळी घरी येत. मूळचा वर्‍हाडचा असलेला  श्रीधर नोकरीनिमित्त नगरला आला आणि नगरचाच झाला. मुळात अबोल-शांत स्वभावाचा श्रीधर नगरच्या काहीशा रांगड्या भूमीलाच  आपली कर्मभूमी करून नगरमध्येच घर करून राहिला. नगर शहराने त्याला असंख्य सुहृद दिलेत. कविमनाचा चित्रकार अशी ओळख  दिली. त्यावेळी घ्दिंडीङ, घ्आदिमङ, घ्ओवीङ अशी कवितेला वाहिलेली दर्जेदार अनियतकालिके नगरहून त्याचे कवी मित्र व तो काढत  असत. त्यांचे संपादन, कवितेची निवड, कवितेवरीच रेखाटने, कवितेची मांडणी असे सबकुछ, तो अतिशय कलात्मकतेने करी. कवितांना त्याने  काढलेल्या रेखाटनांमुळे एक वेगळेच कलात्मक दृश्य परिमाण लाभत असे. कविमनाचे, कविता समजणारे किंवा स्वत: कवी असणारे असे  बोटावर मोजण्याजोगे धनंजय गोवर्धने, भ. मा. परसावळे यांच्यापैकीच श्रीधर अंभोरे हा कलावंत आहे. त्यामुळे त्याला चित्रकार-कवी  म्हणावे की कवी-चित्रकार? हाच खरा प्रश्न आहे.
कवितेतील शब्दांना समजून घेत, त्यातील अर्थाला न्याय देत चित्ररूप देणे वाटते तेवढे सोपे नसते. निव्वळ कोणी चित्रकार  असला म्हणजे त्याला हे जमेल असे नाही, त्यासाठी चित्रकाराजवळठ कवीचे काळीज असावे लागते, श्रीधरजवळ ते असल्यामुळे त्याच्या  रेषांमधून, त्याच्या टिंबांमधून एक आशयघन कविताच साकारत असते. रेषांच्या भावविभोर वेटोळ्यांमधून एक धूसर मानवी आकृती, एक  धूसर मानवी चेहरा दृग्गोचर होत जातो. कवितेमधल्या अगोचर भावनांना असे दृश्यरूप देण्याची ताकद त्याच्या चित्रशैलीत आहे.  त्याने स्वत:ची अशी चित्रशैली तयार केली आहे. ती इतर चित्रकारांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. या चित्रशैलीची चित्रमुद्रा त्याने असंख्य  कविता संग्रहांच्या मुखपृष्ठांवर उमटवली आहे. त्याने जणू स्वत:ची अशी वसंत अबाजी डहाके यांना अभिप्रेत असलेली चित्रलिपीच निर्माण  केली आहे. त्यामुळे पाहता क्षणीच हे रेखाटन श्रीधर अंभोरेंचं आहे, हे चित्राखालचे घ्श्रीधरङ हे नाव न वाचतादेखील चोखंदळ रसिकांच्या  सहज लक्षात येते. चित्रकलेचे कोणतेही पारंपारिक शिक्षण न घेता कोणत्याही चित्रशाळेत किंवा आर्ट स्कूलमध्ये न जाता त्याने ही कला  आत्मसात आणि विकसित केली आहे. त्याच्या मनात सतत रंग, रूप, रेषांचे विभ्रम होत असावेत, तेच त्याच्या चित्रांचे ि नर्माते किंवा  गुरू असावेत. यापेक्षा त्याचा या विषयात कोणी वेगळा गुरू नाही. एकलव्याच्या निष्ठेने त्याने एकट्याने स्वत: ही कला शिकली आहे.  त्यामुळेच मला वाटते तो स्वत:ची वेगळी शैली निर्माण करू शकला आहे. त्याच्यावर कोणत्याही समकालीन कलावंताची छाप नाही.  कदाचित त्याचीच छाप नंतरच्या काही चित्रकर्त्यांवर उमटलेली दिसेल. अमूर्तामधून मूर्त स्वरूप घेणारी, अव्यक्तामधून व्यक्त होत जाणारी  अशी त्याची चित्रं, रसिकांना रेखा आणि टिंबामधून सतत आनंद देत आली आहेत. त्याच्या चित्रांच्या चाहत्यांचा एक कलासक्त वर्ग त्याने  निर्माण केला आहे अन्‌ हेच त्याच्या चित्र नैपुण्याचे यश म्हणता येईल. त्यामुळे साहित्य संमेलन असो की कविसंमेलन त्याच्याबरोबर  फिरताना त्याला ओळखणार्‍या असंख्य रसिकांनी त्याला, त्याच्या चित्रांना दिलेली पावती फारच मोलाची म्हणून जपून ठेवावीशी वाटते.  त्याची कलावंत म्हणून सगळीकडे फिरून, जीवनानुभव घेण्याची असोशी खरोखरीच कौतुकास्पद आहे. गप्पांमध्ये श्रीधर फार कमी बोलत  असे; पण त्याचे निरीक्षण मात्र बारकाईने असे, त्यामुळे त्याने मार्मिकपणे केलेली टिप्पणी सगळ्यांचीच दाद घेऊन जात असे. समूहामध्ये  किंवा व्यासपीठावर श्रीधर संकोचून जातो. तसा तो आजही संकोचणारा व मितभाषी आहे; पण खाजगीमध्ये तो एकदा खुलला की अशी  बहार उडवून देतो की, बस्स... त्याच्या तोंडून त्याने अनुभवलेले वर्‍हाडातील लग्नातील किस्से ऐकताना धमाल येते. घ्वर्‍हाड निघालय  लंडनलाङ च्या धर्तीवरच; पण वर्‍हाडातील वर्‍हाडी आणि वर्‍हाडातील लग्नाच्या रीतीभाती सगळ्या तपशिलासह आणि पात्रांसह तो वर्‍हाडी  बोलीमध्ये अशा उभ्या करतो की, सगळी पात्रं आपल्या भोवती फिरताहेत आणि आपल्या जणू त्या लग्न सोहळ्यामध्येच आहोत असा  भास होतो. हा किस्सा त्याने एकदा माझ्या घरी धनंजय गोवर्धने व तो जेवायला आले असता, जेवणावरून विषय निघाला म्हणून सुरु  केला आणि चक्क अर्धा तास माझी बायको, मुले, सुना आम्ही सर्वच ताटावरच कोरड्या हातांनी त्याचा हा एकपात्री प्रयोग बघत राहिलो.  अक्षरश: हसून-हसून आम्हा सर्वांची मुरकुंडी वळाली; पण श्रीधरने कसलेल्या विनोदी नटाप्रमाणे अभिनय करीत, एकेका व्यक्ती आणि  वल्लीचा आवाज काढत आम्हाला जागीच खिळवून ठेवले, वर-वर शांत, अबोल वाटणार्‍या श्रीधरचे गर्दीमध्ये देखील किती सूक्ष्म निरीक्षण  चालू असते, त्याचा प्रत्यय आला तर प्रा. लक्ष्मण देशपांडेंच्या तोडीचा एकपात्री नट त्या दिवशी आम्हाला श्रीधरच्या रूपाने दिसला !  अभिनयाबरोबरच श्रीधर आणखी एका कलेमध्ये निपुण आहे. ती म्हणजे पाककला! श्रीधर चांगला घ्खवय्याङ आहे; पण त्यापेक्षा चांगला  बल्लवाचार्य आहे. तो स्वत:चा स्वयंपाक स्वत:च करीत आला आहे, एखाद्या सुगरणीसारखा ! स्वत: केलेले पदार्थ आवडीने मित्रांना खाऊ  घालणे, हादेखील त्याचा आवडता छंद! त्यामुळे मित्रांना त्याच्या घरी नि:संकोचपणे कितीही दिवस खाता-पिता राहताही येते. श्रीधरही  एकटाच राहत असल्याने त्याला कोणी मित्र त्याच्याकडे कितीही दिवस राहिल्याची अडचण वाटत नाही, उलट त्यांच्या सहवासात तो  त्याची दु:खे विसरत असावा, खरं तर तो एकटा राहण्याचे दु:खी आहे असे कधीच वाटले नाही.
नगरहून माझी बदली पुढे लातुरला झाल्यावर नाशिकला घरी जाताना किंवा नाशिकहून लातूरला जाताना त्याच्या  आग्रहास्तव बर्‍याचदा त्याच्या घरी माझी बायको-मुलांसह जेवायला थांबत असे. सुटीचा दिवस असला की तो स्वत: मसाला वाटून तयार  करी, माझ्या बायकोने स्वयंपाकाला मदत करायचे झाल्यास घ्वहिनी तुम्ही निवांत बसा, मुलांना सांभाळा, बघा मी एका तासात सगळा  स्वयंपाक कसा करतो...’ आणि खरोखरच कुणाच्याही मदतीशिवाय तो काळ्या मसाल्याचे मटन तयार क री, त्यावेळी हिला अपराधी  वाटे; पण जेवताना पहिला घास घेतला की, त्याच्या जेवणाची चव घेताच आपण श्रीधरलाच स्वयंपाक करू देण्याचे योग्य होते असे वाटे.  मात्र, एकदा न राहवून हिने श्रीधरला स्पष्टपणे बजावले की, घ्भावजी यापुढे मी तुमच्या हातचे जेवणार नाही... तुम्ही लग्न करा तरच मी  जेवीन...ङ पण श्रीधरने ही प्रेमाची धमकी मनावर घेतली नाही, त्याला स्वत:च्या हाताने केलेल्या स्वयंपाकाची एवढी चव लागते की  दुसर्‍याच्या हाताच्या चवीलाच जणू नाकारते !
एक कलावंत म्हणून श्रीधर श्रेष्ठ आहेचं; पण एक मित्र म्हणून माणूस म्हणूनही तो तितकाच श्रेष्ठ आहे. कलेच्या प्रांतामध्ये  तो निखळ म्हणूनच जसा जगत आला आहे, तसाच या व्यवहारी जगात देखील निखळ माणूस म्हणून ! त्याने कधी कुणाची बरोबरी  केली नाही कुणाचा हेवा ! तो दुसर्‍यांच्या दु:खात सहभागी झाला तसा आनंदातही. स्वत: अविवाहित राहुन त्याने दुसर्‍यांच्या संसाराची  काळजी वाहिली. कलंदर कलावंत असूनही दुनियादारी पार पाडली. तो माझ्या लग्नाला आला, तसाच माझ्या मुलांच्याही  लग्नाला स्वत:  जातीनं हजर राहिला. धनंजय गोवर्धने या चित्रकार-कवी मित्राचा तर तो कुटुंबाचाच एक झाला. धनंजयच्या घरी तो नाशिकला येतो, तेव्हा  त्याच्या बायको-मुलांमध्ये रमतो. तेव्हा तो कवी किंवा चित्रकार नसतो. सौ. छाया वहिनींचा दीर म्हणून तर मुलांचा आवडता काका  म्हणून तो कित्येक वर्षे त्यांची काळजी घेत आला आहे. त्याच्या कुटुंबाच्या सुखदु:खात तो सहभागी होतो. अडी-अडचणीला हजर राहतो.  मित्रांना मदत करताना तो त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य होऊन जातो. तो कार्यक्रमास व्यासपीठाची जशी सजावट करतो तशी  सतरंजी, पाट उचलण्यालाही हात लावतो. अविवाहित राहून एकटेपणाने कामे करण्याची त्याची सवय, कदाचित स्त्री-पुरुषांमधील कामांची  विभागणी करू देत नाही. त्यामुळे एखाद्या निपुण गृहिणीसारखे तो स्वत:चे घर तर ठेवतोच; पण तत्परतेने दुसर्‍यांना मदत करायला  सरसावतो. जगण्याची लढाई जिंकण्यासाठी श्रीधरने पोस्टाची नोकरी धरली आणि इमाने-इतबारे केलीदेखील; पण वेळ येताच कलेची सेवा  करून स्वत:ला पूर्णपणे व्यक्त होण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ती तितक्याच हिमतीने सोडलीदेखील ! मात्र, गेली काही वर्षे माझा हा मित्र  पाठदुखीच्या आजाराने जायबंदी झाला, या दुखण्याने त्याच्या हातातील पेन, पेन्सिल, ब्रश गळून पडला याचेच दु:ख जास्त झाले; पण  जगण्याचा श्र्वास झालेल्या चित्रांनी त्याला पुन्हा हिंमत दिली, त्याने या दुखण्यावर मात करून परत एकदा पेन्सिल उचलली आहे.  त्याच्या रेषांच्या वलयांकित दुनियेत परत एकदा हरवून जाण्यासाठी... त्याला यापूर्वी असंख्य पुरस्कार मिळाले असले तरी आता या सेकंड  इनिंगच्या सुरुवातीला मिळणार्‍या अशा पुरस्कारांमुळे त्याचे या रेषा-चित्रांच्या सोबतचे नाते आणखी दृढ होईल आणि त्याच्या कलेचे  नवोन्मेष आपल्यासारख्या त्याच्या रसिक मित्रांना कायमच आनंदाचे विधान ठरतील !